Author: Shriguru Dr. Balaji Tambe

  • ठिसूळ हाडे

    ठिसूळ हाडे

    ‘अस्सल लाकूड भक्कम गाठ ताठर कणा टणक पाठ’
    असे कवी वसंत बापट यांनी वारा खात, गारा खात उन्हात ताठ वावरणाऱ्या एका कार्यकर्त्याचे वर्णन केले आहे. ज्याची हाडे भक्कम आहेत, अशा कुणासाठीही हे वर्णन चालू शकेल. पण या लाकडाचा आतून भुगा होऊ लागला की झाडही वाकू लागतं. हाडांमध्ये जाळी होऊ नये, ती ठिसूळ होऊ नयेत याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी.

    ऑस्टिओ म्हणजे हाड व पोरोसिस म्हणजे सच्छिद्रता, ठिसुळता. तेव्हा हाडे ठिसूळ होणे म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. वास्तविक हाडांचा सापळा हा शरीराचा भक्कम साचा असतो. या साच्याच्या आधारानेच शरीर बांधलेले असते. ताठपणे उभे राहायचे असेल, तर मुळातला हा साचा भक्कम असावा लागतो. ऑस्टिओपोरोसिसमध्ये मात्र साच्यातला कणखरपणा कमी होत असतो.

    हाडांच्या संरचनेबद्दल आयुर्वेदात सांगितले आहे-
    देहे शरीरधारकः कठिनतमः सारो धातुः।।…सुश्रुत सूत्रस्थान
    शरीर धारण करणारा सर्वांत कठीण, सारस्वरूप असणारा धातू म्हणजे अस्थिधातू होय.
    अस्थ्नोः जनिः स्वोष्मणः कृतः
    पृथिव्यग्न्यनिलादीनां संघातः खरत्वं प्रकरोति।
    ततोऽस्य नृणामस्थि जायते।
    अस्थ्नां मध्ये समीरिणः सौषिर्यं करोति।
    …चरक चिकित्सास्थान
    पृथ्वी, अग्नी आणि वायू यांचे एकत्र पचन होत असताना कठीणत्व तयार होते, त्यातून अस्थी तयार होतात. वायू अस्थींमध्ये पोकळी वा सच्छिद्रता निर्माण करतो.
    तत्स्वरूपम्‌ कठिनं स्थिरं, मज्जपूर्णं सुषिरम्‌।
    …अष्टांग हृदय, काश्‍यपसंहिता
    हाडे कठीण असतात, स्थिर असतात, सच्छिद्र व मज्जेने भरलेली असतात. पृथ्वी महाभूताचा संबंध असल्याने हाडे कठीण व स्थिर असतात आणि वायू महाभूताचा संबंध असल्याने हाडांमध्ये सच्छिद्रता असते. मज्जाधातू राहावा म्हणून हाडांमध्ये उचित पोकळी असते.
    मात्र, अस्थिधातूमधील पृथ्वी, अग्नी व वायू यांचे संतुलन बिघडले, की अस्थींमधली स्थिरता कमी होते व सच्छिद्रता वाढायला लागते आणि त्यातूनच ऑस्टिओपोरोसिसची सुरवात होते.

    रजोनिवृत्तीनंतरही शरीरात वातदोष वाढत असल्याने ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्‍यता वाढते. वयानुसार वाढणाऱ्या वाताला नियंत्रित केले नाही, तर त्यामुळेही अस्थी धातूतील सच्छिद्रता वाढू शकते. याशिवाय बाळंतपणानंतर वातदोषाला संतुलित करण्यासाठीचे उपचार न करणे, हाडांना पोषक आहारपदार्थांचे सेवन न करणे, स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे जाणे, शरीरावश्‍यक धातू खर्च होणे, पुरुषांमध्ये शुक्रधातू अति प्रमाणात खर्च होणे यांसारख्या अनेक कारणांनी हाडांमध्ये वात वाढून ऑस्टिओपोरोसिसची संप्राप्ती सुरू होऊ शकते.
    ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडांची स्थिरता, घनता कमी होत असल्याने हाड मोडण्याची शक्‍यता वाढते. याशिवाय अस्थिक्षयाची म्हणून आयुर्वेदात सांगितलेली लक्षणेही दिसू लागतात.

    लक्षणे –
    केशलोमनखश्‍मश्रु द्विजप्रपतनं श्रमः।
    ज्ञेयमस्थिक्षये लिङगं सन्धिशैथिल्यमेव च।।
    …चरक सूत्रस्थान
    – केस, रोम, मिशा वगैरे झडणे
    – नखे न वाढणे वा तुटणे
    – दात तुटणे
    – सांध्यांमध्ये शैथिल्य उत्पन्न होणे
    – थोड्याही श्रमाने थकवा येणे

    याखेरीज ऑस्टिओपोरोसिसमध्ये सामान्यतः दिसणारी लक्षणे याप्रमाणे होत-
    – हात-पाय दुखणे
    – सांधे दुखणे
    – तोंड कोरडे पडणे
    – ताठ उभे राहता न येणे
    – कंबर-पाठ दुखणे
    – अशक्‍तता जाणवणे

    प्रतिबंधात्मक उपाय –
    आयुर्वेदिक जीवनशैलीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, की त्यांचा रोजच्या जीवनात समावेश केला, तर ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध करता येईल.
    अभ्यंग- अंगाला नियमित तेल लावणे व ते आतपर्यंत जिरवणे हे सर्व धातूंसाठी पोषक सांगितले आहे. शास्त्रोक्‍त पद्धतीने तेल सिद्ध केलेले असेल, तर ते खरोखर आतपर्यंत जिरून अगदी हाडांपर्यंतही पोचू शकते व तेथे वातदोषाला संतुलित करून ऑस्टिओपोरोसिस होण्यास प्रतिबंध करू शकते. वाढलेला वात कमी करण्यासाठी म्हणजे ऑस्टिओपोरोसिसमुळे झिजणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्यासाठीही अभ्यंग करण्याचा उपयोग होताना दिसतो.
    व्यायाम – प्रकृतिनुरूप योग्य व्यायाम करण्याने सर्व शरीरधातू स्थिर होतात, सशक्‍त बनतात, असे सांगितले जाते. म्हणूनच नियमित व्यायामाने वात संतुलित ठेवता आला, की त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध होऊ शकतो. व्यायामाच्या बाबतीत लक्षात घ्यायला हवे, की अतिव्यायाम, शरीरशक्‍तीचा विचार न करता केलेल्या व्यायामामुळे वात वाढून अपाय होऊ शकतो. तेव्हा शरीर दृढ होईल, असा व्यायाम करणेच चांगले.

    झोप – योग्य वेळेला योग्य प्रमाणात झोपणे हे सुद्धा धातुपोषक असते; तसेच शरीरदृढता, शरीरशक्‍ती टिकविण्यासाठी महत्त्वाची असते. रात्र-रात्र जागरण करणे, आवश्‍यकतेपेक्षा कमी झोपणे यामुळे वात वाढून उलट ऑस्टिओपोरोसिसला हातभार लागू शकतो.

    संतुलित आहार – आहारात सातही धातूंचे पोषण होईल अशी तत्त्वे असावीत, असे आयुर्वेद सांगतो; तसेच घेतलेला आहार पचून अंगी लागेल व सातही धातू सशक्‍त राहतील यासाठी मुळात पचनसंस्था व्यवस्थित असणे आवश्‍यक असते. हे दोन्ही हेतू साध्य होण्यासाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा ठरतो. ऑस्टिओपोरोसिस टाळण्याच्या दृष्टीने आहारात दूध, खारीक, तुपात तळलेल्या डिंकाची लाही, शतावरी कल्प वगैरे पदार्थ असणे अपेक्षित होय.

    औषधे घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की औषधे शरीरात सात्म्य व्हायला पाहिजेत, म्हणजे पचन झाले पाहिजे. शिवाय रासायनिक औषधे उष्ण पडणार नाहीत व इतर कोठली रिऍक्‍शन येणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. मौक्‍तिक, प्रवाळ या नैसर्गिक वस्तू उष्ण नसतात.
    थोडक्‍यात, योग्य उपचार केले, आहारात योग्य ती काळजी घेतली, तर ऑस्टिओपोरोसिसची भीती बाळगायची गरज नाही.

    ऑस्टिओपोरोसिसवर काही सामान्य उपाय सांगता येतील –
    – अंगाला नियमितपणे तेल लावणे. हे तेल वातशामक औषधांनी सिद्ध केलेले आहे व आत हाडांपर्यंत जिरण्याच्या क्षमतेचे आहे याची खात्री असायला हवी.
    – आहारात वातशमनाच्या दृष्टीने घरचे ताजे लोणी, साजूक तूप, मधुर चवीच्या पदार्थांचा समावेश करणे.
    – सेवन केलेला आहार हाडांपर्यंत पोचू शकेल यासाठी पचन व्यवस्थित ठेवणे.
    – आहारद्रव्यांपैकी दूध, खारीक, डिंकाचे लाडू वगैरेंचा, तर औषधद्रव्यांपैकी अश्‍वगंधा, प्रवाळभस्म, शंखभस्म, शतावरी, बला वगैरेंचे सेवन करणे.
    – कपभर दुधात चमचाभर खारकेची पूड टाकून मंद आचेवर थोडेसे उकळून पिणे.
    – प्रवाळपंचामृत, मुक्‍ता वटी, कॅल्सिसॅन, पित्तशांती वगैरे नैसर्गिक कॅल्शियमयुक्‍त योगांचे सेवन करणे.
    – पुनर्जीवनाच्या दृष्टीने शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन घेणे व नंतर अस्थिपोषक द्रव्यांनी; तसेच तिक्‍तरसयुक्‍त द्रव्यांनी सिद्ध तेल व दुधाची बस्ती घेणे.
    – गंध तेल, च्यवनप्राश, “मॅरोसॅन’, “सॅनरोझ’सारख्या रसायनांचे सेवन करणे.
    ऑस्टिओपोरोसिसवर उपचार करताना …
    – वातदोष संतुलित करणे.
    – हाडांना पोषक तत्त्वांचा पुरवठा करून अधिकाधिक झीज होण्यास प्रतिबंध करणे.
    – एकंदर शरीराचे पुनर्जीवन करून झालेली झीज भरून काढणे.

    – डॉ. श्री बालाजी तांबे

  • हाडांची काळजी

    हाडांची काळजी

    मनुष्याच्या शरीरातला अस्थिधातू नीट पोसला गेला नाही, तर हाडे कमकुवत वा भुसभुशीत होतात. अशी हाडे शरीराला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आधार देऊ शकतात. वास्तविक पाहता हाडे 100 वर्षे व्यवस्थित काम करतील अशीच असतात. तेव्हा आयुष्यात हाडांची काळजी घेतली गेली तर अशा तऱ्हेच्या रोगाचा त्रास होऊ नये.

    ऑस्टिओ म्हणजे हाडे व पोरोसिस म्हणजे छिद्रे असलेले. भुसभुशीत हाडे, असे ऑस्टिओपोरोसिस या शब्दाचे भाषांतर करायला हरकत नाही.
    कोकणात आमचे एक स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय जुने आहे. आमच्या पूर्वजांपैकी एकाला दृष्टान्त देऊन श्री गणेशांनी त्या ठिकाणी वास्तव्य केले. माहेरची तांबे असलेली झाशीची राणी या गणपतीच्या दर्शनाला गेली असता त्या वेळी तिने तिचा हत्ती कोठे बांधला होता, असे सांगणारी मंडळी गावात आहेत. दर वर्षी माघी चतुर्थीला या गणपतीचा उत्सव असतो. हा गजानन नवसाला पावतो, त्याच्याशी बोलता येते, त्याला आपली संकटे सांगून सोडवून घेता येतात, अशी अनेकांची श्रद्धा असल्याने चतुर्थीचा उत्सव जोरात होतो. काळाच्या ओघात तांबे मंडळी इकडे तिकडे पसरून गेली व आज तांब्यांची फक्‍त एक-दोन घरे तेथे आहेत. हे मंदिर जुने असले तरी अत्यंत सुंदर आहे. बाहेर सभामंडप असून, आतल्या छोट्या गर्भागारात श्री गजाननाची मूर्ती आहे. बाहेरच्या सभामंडपाला सहजपणे कवेत घेता येणार नाहीत, असे लाकडी खांब होते. हे खांब दिसायला व आकाराला फार सुंदर असले तरी ते सभामंडपातील मोठी जागा व्यापून उभे होते. खांबाच्या अंगावर जेव्हा भोके दिसायला लागली तेव्हा नीट पाहता लक्षात आले, की खांब आतून वाळवी वा किड्यांनी पोखरले गेले आहेत. खांबांची परीक्षा करणे खूप सोपे होते. बाहेरून टिचकीने वाजवले, की आतला पोकळपणा सहज कळून येत असे. मंदिर केव्हा पडेल, याची शाश्‍वती वाटेनाशी झाल्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार केला. अर्थात मूळ मंदिराची कोकणी पद्धतीची बांधणी होती तशीच ठेवून संपूर्ण मंदिर स्टील वापरून पुन्हा बांधून काढले. जेणेकरून सभामंडपातील जागाही वाढली.

    मंदिराचे खांब जसे पोकळ झाले, तसेच मनुष्याच्या शरीरातला अस्थिधातू नीट पोसला गेला नाही, तर हाडे कमकुवत वा भुसभुशीत होतात. अशी हाडे शरीराला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आधार देऊ शकतात. साधारण धक्का लागला तरी हाड मोडणे, सांधे मजबूत न राहिल्याने सांध्यांच्या ठिकाणी दुखणे, अशा तऱ्हेचे विकार सुरू होतात. एकूणच हाडांमधली ताकद कमी होणे वा त्यात छिद्रे पडणे वा ती भुसभुशीत होणे, या सर्व प्रकाराला “ऑस्टिओपोरोसिस’ वा “अस्थिधातूचे दौर्बल्य’ असे म्हणायला हरकत नाही.

    याची कारणे अनेक असू शकतात. हाडांचे पोषण करणारे सर्वांत महत्त्वाचे अन्न आहे दूध व दुधाचे पदार्थ. जाड होण्याच्या भीतीने अनेकांनी दूधदुभते बंद केले व हा विकार वाढायला सुरवात झाली. इतर पदार्थांत कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे, एवढीच गोष्ट पाहणे पुरेसे नसून, त्यातील कॅल्शियम शरीरात सुलभपणे सात्म्य होईल व शरीरात अतिरिक्‍त उष्णता उत्पन्न होणार नाही, या गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्‍यक असते. अशा पदार्थांची आहारात कमतरता झाल्यामुळे हा विकार वाढणे अधिकच सोपे झाले. शिवाय मनुष्याला एकूणच सूर्यप्रकाश कमी मिळू लागला, पर्यावरण प्रदूषित झाले, गगनचुंबी खोल्यांमध्ये दोन वा तीन खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना घरात तर सूर्यप्रकाश मिळेनासा झालाच; पण या उंच घरांच्या सावल्या रस्त्यावर पडल्याने रस्त्यावरही सूर्यप्रकाश मिळेनासा झाला.

    हे कारणही हाडे भुसभुशीत होण्यासाठी पुरेसे असते. सारखे वातानुकूलित हवेत राहिल्यामुळे श्‍वसनावर व पचनावर परिणाम होऊन सरतेशेवटी याची परिणती मेदधातूच्या पलीकडे असणारे अस्थी, मज्जा व वीर्यधातू कमकुवत होण्यात होते. शिवाय सतत उभे राहून काम करणे, शरीराच्या ताकदीपलीकडे अति काम करणे, पैशाच्या लोभापायी काळवेळ न पाहता काम करणे, अशा सर्व कारणांनीसुद्धा असा विकार होऊ शकतो. अति मानसिक ताण किंवा अग्नीचे असंतुलन, हॉर्मोनल असंतुलन या कारणांमुळेसुद्धा एकूण शरीराचे संतुलन बिघडून मज्जा, अस्थी, वीर्य यावर परिणाम दिसून येतात. स्त्रियांच्या बाबतीत पाळीतील दोषांमुळे अंगावरून लाल-पांढरे जाण्याचा विकार जडल्यास पुढे हाडे भुसभुशीत होऊ शकतात. तेव्हा ऑस्टिओपोरोसिस हा रोग व्हायला एक ना दोन- अनेक कारणे असतात.

    एका बाजूने घर बांधत असताना कॉंक्रिटमध्ये टाकलेल्या सळया गंजून जाऊ नयेत, जास्ती टिकाव्यात यासाठी त्यांच्यावर वेष्टण केले जाते, तर दुसऱ्या बाजूने मनुष्याच्या अस्तित्वासाठी असलेले शरीर ज्या आर.सी.सी.रूपी हाडांवर उभे आहे, त्या हाडांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.
    हाडे कमकुवत होत आहेत, हे वेळच्या वेळी लक्षात आले तर ठीक असते अन्यथा मोठे त्रास होऊ शकतात. सध्या हाडे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ती कमकुवत झाली आहेत का, हे शोधण्यावर अधिक लक्ष दिलेले दिसते. हाडांचा कठीणपणा (घनता – डेन्सिटी) शोधणारी यंत्रे निर्माण झाली आहेत. तपासणी झाल्यानंतर अनेक प्रकारच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या जातात. या गोळ्या पोटात गेल्यावर स्वीकारल्या जातात किंवा नाही, त्या शरीराला सात्म्य होतात की नाही व त्यांचा शरीरावर दुसरा काही परिणाम होतो आहे का, याकडे दुर्लक्ष केले जाते. वास्तविक पाहता हाडे 100 वर्षे व्यवस्थित काम करतील अशीच असतात. तेव्हा आयुष्यात हाडांची काळजी घेतली गेली तर अशा तऱ्हेच्या रोगाचा त्रास होऊ नये. परंतु पूर्वी म्हटल्यानुसार आहारात दूध-दुभत्याचा अभाव असतो; डिंक, खारीक, शतावरी या पदार्थांची तर नावेच ऐकलेली नसतात.

    आयुर्वेदाने सुचविलेली प्रवाळ, मौक्‍तिक, शौक्‍तिक वगैरेंपासून बनविलेली कॅल्शियमयुक्‍त औषधे शरीरात उष्णता न वाढवता हाडांना मजबुती आणतात. ही नैसर्गिक द्रव्ये थोडी महाग असल्यामुळे स्वस्तातला चुना खाण्यात काही अर्थ नाही. हाडे बळकट करण्यासाठी उपलब्ध असलेली स्वस्तातली औषधे एकूणच “भीक नको पण कुत्रा आवर’ या वर्गातली असतात. स्वस्त-महाग पाहत असताना काळाचेही गणित सांभाळावे लागते, याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केलेले दिसते. स्वस्तातला कंपास घेतल्यास दर वर्षी मुलाला नवीन कंपास घेऊन द्यावा लागल्याची उदाहरणे दिसतात. याउलट वडील इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिकताना त्यांनी वापरलेला कंपास त्यांच्या मुलाने तो इंजिनिअरिंग शिकत असताना वापरता येणार असला तर वडिलांना सुरवातीला महाग वाटणारा कंपास शेवटी स्वस्त ठरतो. अशी चांगली वस्तू घरात असल्याचे समाधान मिळते ते वेगळेच.

    शरीरातील हाडे खूप महत्त्वाची असतात व या अस्थिधातूचे संरक्षण करणे, हाच ऑस्टिओपोरोसिसवरचा खरा इलाज आहे.

  • कथा च्यवनप्राशाची

    कथा च्यवनप्राशाची

    कथा च्यवनप्राशाची

    आयुर्वेद हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो. वनस्पतीवर संस्कार झाले तर त्यांचा स्वभाव बदलता येतो म्हणजेच त्या वनस्पतींचे गुणधर्म वाढवता येतात व मानवाला उपयोगी ठरतील असे गुणधर्म त्यात आणता येतात.

    च्यवन ऋषींनी अगदी म्हातारपण आल्यानंतर म्हणजे वृद्धत्वाची सर्व लक्षणे दिसू लागल्यानंतर, बरोबरीने मेरुदंड वाकून डोके जमिनीकडे जायला लागल्यानंतर संतानप्राप्तीची अपेक्षा केली. म्हणून प्रत्यक्ष अश्‍विनीकुमारांनी हा आवळ्याचा च्यवनप्राश बनवून त्यांना दिला व त्यानंतर त्यांचे वयस्थापन झाले म्हणजे त्यांना तारुण्य परत मिळाले, पाठीच्या मणक्‍यांना ताकद मिळाली, वीर्यवृद्धी झाली आणि उशिरा सुरू केलेला संसार साधता आला आणि ते निसर्गचक्राला गती देण्यास समर्थ झाले.

    आयुर्वेद हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो. वनस्पतीवर संस्कार झाले तर त्यांचा स्वभाव बदलता येतो म्हणजेच त्या वनस्पतींचे गुणधर्म वाढवता येतात व मानवाला उपयोगी ठरतील असे गुणधर्म त्यात आणता येतात.

    आवळ्याच्या झाडाखाली श्री विष्णूंचा वास असतो म्हणून आवळ्याच्या झाडाचे आणि श्री विष्णूंचे पूजन व आवळीच्या सावलीत भोजन सांगितलेले असते. आवळ्याच्या झाडाच्या आसपास असणाऱ्या वातावरणात प्रतिकारशक्‍ती वाढवून चेतासंस्थेसाठी फायदा होईल असे वायू व शक्‍ती असणार म्हणूनच ह्या परंपरा भारतीयांनी स्वीकारल्या.

    आवळा चोचून साखरेच्या पाकात टाकून केलेला मोरावळा हा अवलेह सर्वांच्या परिचयाचा असतो. आवळा, आवळ्याचा रस, मोरावळा ही सर्व रसायनेच आहेत. म्हणूनच आवळा, हिरडा, बेहडा यांच्यापासून बनविलेला त्रिफळा हे सुद्धा एक रसायनच आहे. हिरडा हे स्वतंत्ररीत्याही एक रसायन आहेच.

    शिजवलेले आवळे, साखरेचा पाक व वेगवेगळ्या वनस्पतींची चूर्ण, घन वगैरे गोष्टींचे मिश्रण म्हणजे च्यवनप्राश नव्हे. आवळा कमी पडतो म्हणून आवळ्याच्या ऐवजी भोपळा टाकून बनविलेल्या च्यवनप्राशबद्दल तर काही बोलायलाच नको. च्यवनप्राश बनविताना वात-पित्त-कफ ह्यांचे संतुलन करणाऱ्या तसेच सप्तधातूंना संतुलित करून पुष्ट करणाऱ्या वनस्पती तसेच रक्‍तशुद्धीसाठी व एकूणच शरीराची प्रतिकारशक्‍ती वाढावी, वीर्यवर्धन व्हावे ह्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींची योजना करून त्यांचा काढा बनविणे अभिप्रेत असते. काढा केल्याने वनस्पतींमध्ये असलेली द्रव्ये अति सूक्ष्म कणात (नॅनो) रूपांतरित होतात. काढा होत असताना त्यात आवळे शिजवले जातात त्यामुळे आवळ्यांवर वनस्पतींचा संस्कार व्हायला सुरुवात होते. शिजलेल्या आवळ्यांमधील बिया व रेषा काढून मिळालेला गर तुपावर लालसर परतून घेतला जातो, नंतर तेलावर परतला जातो. तयार झालेला काढा गाळून घेऊन वनस्पती टाकून दिल्या जातात व उरलेला काढा घट्ट केला जातो. साखरेच्या पाकात काढा व तेला-तुपावर परतलेला गर टाकून मिश्रण परत शिजविले जाते. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात मध, सुगंधी द्रव्ये मिसळली जातात. ह्या सुगंधी द्रव्यांच्या औषधी गुणधर्माचा फायदा होतोच पण मन प्रसन्न करण्यासाठीही उपयोग होतो. हा झाला आयुर्वेदात सांगितलेल्या पाठानुसार बनविलेला च्यवनप्राश.

    ताज्या आवळ्यांऐवजी वाळलेले आवळे म्हणजे आवळकाठी, इतर वनस्पती एकत्र शिजवून त्यात साखर टाकून केलेल्या पदार्थाला च्यवनप्राश असे म्हणता येणार नाही. अश्‍विनीकुमारांनी च्यवनऋषींसाठी केलेला प्राश तो खरा च्यवनप्राश. तो बनविण्याची पद्धत बदलली, संस्कार करण्याची परंपरा बदलली तर बनलेल्या पदार्थाला च्यवनप्राश म्हणता येत नाही. शिवाय च्यवनप्राश बनविताना त्यातील काही महाग वनस्पती वापरल्याच नाही तरी त्याला च्यवनप्राश म्हणता येत नाही, त्याचा उपयोग पोळी-भाकरीबरोबर जॅम म्हणून खाण्यासाठी होऊ शकतो.

    च्यवनप्राश प्रत्यक्ष अश्‍विनीकुमारांनी मानवजातीला दिलेला प्रसाद आहे. सर्वसामान्यांना सर्वात सोपे रसायन कायम सेवन करता यावे आणि आजारपण दूर ठेवता यावे, तसेच शारीरिक ताकद चांगली राहावी यासाठी च्यवनप्राशची योजना करावी असे सांगितलेले आहे.

    प्रत्येकाने जर आवळ्याच्या ऋतूमध्ये आवळे घरी आणून च्यवनप्राश बनविण्याचा प्रयत्न केला तर वर्षभर घरात ठेवून प्रत्येकाला आपण स्वतः बनविलेला च्यवनप्राश सेवन केल्याचे समाधान मिळेल. यासाठी आवश्‍यक असलेल्या वनस्पती आणताना मात्र माहितगार व्यक्‍ती बरोबर असावी कारण वनस्पती बरोबर आहेत का शिवाय त्या वीर्यवान आहेत का वगैरे गोष्टी पारखून घेता येतील. च्यवनप्राश बनविताना दशमूळांचे महत्त्व असते. बाजारात मिळणाऱ्या दशमूळ भरड वा चूर्ण ह्या पदार्थात सर्व घटक आहेत का वा सर्व घटक योग्य प्रमाणात घेतलेले आहेत का हे कळायला काही मार्ग नसतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेला च्यवनप्राश सर्व लहान-मोठ्यांनी व सर्व ऋतूत सेवन करून वर्षभर सुखी तर व्हावेच व बरोबरीने वयस्थापन करून तारुण्य टिकवावे आणि जीवनाचा आनंद मिळत राहील. अशी ही च्यवनप्राशाची कथा.
    डॉ. श्री बालाजी तांबे

    अशी वाढवा प्रतिकारशक्तीकायाकल्प– चवनप्राशच्या नियमित सेवनाने जोश वाढतो

    अशी वाढवा प्रतिकारशक्तीस्मृती व बुद्धिवर्धक – बुद्धी तल्लख होण्यासाठी उपयोगी

    अशी वाढवा प्रतिकारशक्तीआयुष्यवर्धन – आयुष्यमान वाढवण्यासाठी नियमित सेवन करावे

    अशी वाढवा प्रतिकारशक्तीमेरुदंडाचे पुनर्जीवन – चवनप्राशमुळे पाठीच्या कण्याला लाभ होतो

    रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी – ह्यामध्ये आवळा असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते

  • अशी वाढवा प्रतिकारशक्ती

    अशी वाढवा प्रतिकारशक्ती

    रोगप्रतिकारशक्‍ती

    उत्तम आरोग्यासाठी, संपन्न जीवनासाठी रोगप्रतिकारशक्‍ती व्यवस्थित हवी. सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या, वाढत्या रोगराईच्या काळात तर रोगप्रतिकारशक्‍ती चांगली ठेवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करायलाच हवेत आणि त्यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली, आयुर्वेदिक रसायने यांना पर्याय नाही.
    रोगांना प्रतिकार करू शकणारी शक्‍ती म्हणजे रोगप्रतिकारशक्‍ती. आरोग्याचे रक्षण हे आयुर्वेदाचे प्रथम आणि महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आरोग्यरक्षण म्हणताना त्यामागे उत्तम रोगप्रतिकारशक्‍ती अध्याहृत असतेच.
    आयुर्वेदात मांडलेली व्याधिक्षमत्व ही संकल्पना रोगप्रतिकारशक्‍तीशी मिळती-जुळती आहे. व्याधिक्षमत्व जितके चांगले तेवढी रोग होण्याची शक्‍यता कमी, याउलट व्याधिक्षमत्व जेवढे कमी तितकी आजार होण्याची शक्‍यता अधिक. व्याधिक्षमत्व कमी असू शकणाऱ्या काही स्थिती आयुर्वेदात याप्रमाणे सांगितल्या आहेत.
    शरीराणि चातिस्थूलानि अतिकृशानि अनिविष्टमांसशोणितास्थीननि दुर्बलानि असात्म्य-आहारोपचितानि अल्पाहाराणि अल्पसत्त्वानि च भवन्ति अव्याधिसहानि, विपरीतानि पुनर्व्याधिसहानि ।
    …चरक सूत्रस्थान

    १. अतिस्थूल

    सप्तधातूंपैकी फक्‍त मेदधातूच शरीरात वाढला, तर त्यामुळे शरीराची एकंदर ताकद कमी होते. विशेषतः मेदधातूच्या पुढील धातू म्हणजे अस्थी, मज्जा, शुक्र या महत्त्वाच्या धातूंपर्यंत पोषण पोचले नाही, की शरीर हळूहळू निःसत्त्व होऊ लागते व त्यातून रोगप्रतिकारशक्‍ती कमी होते.

    २. अतिकृश

    जीवनशक्‍ती, रोगप्रतिकारशक्‍ती ही धातूंच्या आधाराने राहत असते. विशेषतः रसधातू, रक्‍तधातू, मज्जाधातू, शुक्रधातू हे सर्व धातू जीवनशक्‍तीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. अतिकृश व्यक्‍तींमध्ये धातूंचे प्रमाणच कमी असल्याने रोगप्रतिकारशक्‍ती कमी असते.

    ३. रक्‍त, मांस व हाडे शिथिल असणाऱ्या व्यक्‍ती

    रक्‍तधातूच्या ठिकाणी प्राण राहतात. मांसाच्या दृढतेवर, कणखरतेवर एकंदर शरीरशक्‍ती अवलंबून असते आणि हाडे म्हणजे शरीराचा मुख्य आधार, मुख्य कणा असतो. हे तिन्ही धातू व्यवस्थित नसतील, प्रमाणबद्ध नसतील, तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी होऊ शकते.

    ४. दुर्बल

    स्वभावतःच ताकद कमी असल्यास किंवा खूप प्रवास, खूप परिश्रम, अति मानसिक ताण, एखादे मोठे आजारपण यामुळेही प्रतिकारशक्‍ती कमी होत असते.

    ५. असात्म्य आहार करणाऱ्या व्यक्‍ती –

    असात्म्य अन्न म्हणजे प्रकृतीला प्रतिकूल असणारे, शरीरात सहजपणे सामावू न शकणारे अन्न. जीवनशक्‍ती हवी तर त्यासाठी संपन्न धातू हवेत आणि संपन्न धातू हवे असले, तर पोषक, प्रकृतिनुरूप आहार सेवन कराला हवा. शरीरपोषणाचा विचार न करता कुठलेही अन्न सेवन करणाऱ्यांची प्रतिकारशक्‍ती, जीवनशक्‍ती कमी होऊ शकते, असे आयुर्वेदशास्त्र सांगते.

    ६. अल्प आहार करणाऱ्या व्यक्‍ती

    सर्वमन्ने प्रतिष्ठितम्‌ असे आयुर्वेदात सांगितले जाते. प्रतिकारशक्‍ती चांगली असण्यासाठी सकस, पोषक आणि पुरेसे अन्न खूप महत्त्वाचे असते. उपवास वा अन्य काही कारणांमुळे पुरेसे अन्न सेवन न करणे एकंदर शरीरशक्‍तीसाठी, प्रतिकारशक्‍तीसाठी चांगले नाही.

    ७. कमकुवत मन असणाऱ्या व्यक्‍ती

    मनाची शक्‍ती शरीरशक्‍तीपेक्षाही प्रभावी असते हे आपण जाणतोच. मनाची उभारी असेपर्यंत, मन श्रद्धा व विश्‍वासाने युक्‍त असेपर्यंत एकंदर शरीरशक्‍ती, जीवनशक्‍ती चांगली असते. अगदी मोठ्या आजारपणातूनही कणखर मनाच्या व्यक्‍ती संपूर्णपणे बऱ्या होतात. निरोगी शरीर असूनही, मन कमकुवत असले, तर रोग होण्यास वेळ लागत नाही हे आपण व्यवहारात अनेकदा पाहतो. थोडक्‍यात, या सात प्रकारांत मोडणाऱ्या व्यक्‍तीचे व्याधिक्षमत्व म्हणजेच रोगप्रतिकारशक्‍ती कमी असते, तर याविरुद्ध म्हणजे प्रकृतिनुरूप बांधा असणाऱ्या, कणखर व दृढ शरीरधातू असणाऱ्या, उत्तम शरीरशक्‍ती असणाऱ्या, प्रकृतिनुरूप व सत्त्वयुक्‍त अन्नाचे योग्य प्रमाणात सेवन करणाऱ्या व सशक्‍त मन असणाऱ्यांचे व्याधिक्षमत्व चांगले असते. व्याधिक्षमत्व, प्रतिकारशक्‍ती चांगली असण्यासाठी जबाबदार असणारे शरीरघटक खालीलप्रमाणे सांगता येतील.

    अग्नी –  बलमारोग्यमायुश्‍च प्राणाश्‍चाग्नौ प्रतिष्ठिता ।।
    …चरक सूत्रस्थान
    बल, आरोग्य, दीर्घायुष्य, प्राण हे सर्व अग्नीमध्ये प्रतिष्ठित असतात. म्हणजेच आरोग्य टिकविण्यासाठी, रोग होऊ नयेत यासाठी अग्नी संपन्न असणे आवश्‍यक असते. आहार-औषधातून पोषक तत्त्वे शरीरात गेली, तरीही ती पचवून शरीरात स्वीकारली जाण्यासाठी अग्नी आवश्‍यक असतो. आहाररसापासून सप्तधातू तयार होण्यासाठीही अग्नीची शक्‍ती लागतेच. सतेजता, काम करण्यासाठी लागणारी शक्‍ती आणि काम करण्यासाठी लागणारा उत्साह या गोष्टीही अग्नीवरच अवलंबून असतात.

    रसधातू –  रसधातू सर्व शरीरावयवांना तृप्त करण्याचे काम करत असतो. म्हणूनच रसधातू प्रमाणापेक्षा कमी झाला, तर त्यामुळे शरीरशक्‍ती कमी होते, थकवा जाणवतो, थोड्याही श्रमाने दम लागतो. अर्थातच, रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी रसधातू चांगला ठेवणे आवश्‍यक असते.

    रक्‍तधातू –  शरीरात ज्या दहा ठिकाणी प्राण राहतो, त्यांपैकी एक रक्‍तधातू होय. रक्‍तधातू शुद्ध व उत्तम असता शरीरशक्‍ती चांगली असते, वर्ण उत्तम असतो, जीवनशक्‍ती उत्तम असते आणि आयुष्य सुखाने संपन्न असते, असे आयुर्वेद म्हणतो. तेव्हा रोग होऊ नयेत यासाठी रक्‍तधातू उत्तम ठेवायलाच हवा. रक्‍त म्हणजे साक्षात जीवन असे आयुर्वेदात सांगितले आहे, त्यावरून रक्‍ताचे महत्त्व कळते. प्रत्यक्षातही हिमोग्लोबिन किंवा लोहतत्त्व कमी असणाऱ्या व्यक्‍तींमध्ये रोगप्रतिकारशक्‍ती कमी दिसते.

    मज्जाधातू –  मज्जा स्नेहं बलं शुक्रपुष्टिं पूरणमस्थ्नां च करोति ।
    …सुश्रुत सूत्रस्थान
    शरीराला उचित स्निग्धता देण्याचे, शरीरशक्‍ती उत्तम ठेवण्याचे, हाडांना व शुक्रधातूला पोसण्याचे महत्त्वाचे काम मज्जाधातू करत असतो. मेंदू, चेतासंस्था वगैरे महत्त्वाच्या गोष्टी मज्जाधातूवर अवलंबून असतात. काही कारणास्तव मज्जाधातू अशक्‍त झाला, तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी होताना दिसते.

    शुक्रधातू-  शुक्रधातू सर्व धातूंमधील शेवटचा धातू. अनेक वेळेला शुद्ध केलेले सुवर्ण जसे तेजस्वी व सारसंपन्न असते, त्याचप्रमाणे प्रत्येक धातू तयार होताना मलभाग निघून गेल्यामुळे शेवटचा शुक्रधातू अतिशय संपन्न असतो. शुक्रधातूचे वैशिष्ट्य म्हणजे तो फक्‍त शरीराची ताकद वाढवतो असे नाही, तर मनालाही शक्‍ती देतो, धैर्य देतो, उत्साह निर्माण करतो. या सर्व गोष्टींमुळे रोगप्रतिकारशक्‍ती व्यवस्थित राहण्यास मदत मिळते.

    ओज-  ओज हे सुद्धा प्राणाचे राहण्याचे उत्तम स्थान असते. ओजामुळे सर्व शरीर अवयवांना स्थिरता मिळते, शरीरातील सर्व कार्ये व्यवस्थित चालू राहतात. व्यक्‍तीची एकंदर तेजस्विता, सतेजता ओजावर अवलंबून असते. सर्व धातूंचे साररूपी ओजतत्त्व काही कारणास्तव कमी झाले, तर अनेक रोग होऊ शकतात, प्रसंगी मृत्यूसुद्धा येऊ शकतो, असे सांगितले जाते. म्हणूनच रोगप्रतिकारशक्‍ती व ओजतत्त्वाचा खूप जवळचा संबंध असतो. तेव्हा रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी या सर्व शरीरतत्त्वांचे व्यवस्थित पोषण होण्याकडे लक्ष ठेवायला हवे व त्याहून महत्त्वाचे म्हणजे या तत्त्वांचा क्षय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

    रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी…
    आरोग्यरक्षणासाठी आयुर्वेदाने सांगितलेले सर्व उपाय रोगप्रतिकारशक्‍ती टिकून राहावी व वाढावी यासाठी उत्तम असतात.
    दिनचर्येत अंतर्भूत केलेले अभ्यंग, उद्वर्तन, नस्य, अंजन, व्यायाम वगैरे सर्व गोष्टी प्रतिकारशक्‍ती वाढवूनच आरोग्यरक्षण करत असतात.
    प्रकृतिनुरूप व ऋतुनुरूप आहार घेणे, मनाच्या शांती व प्रसन्नतेसाठी योग, ध्यान वगैरे गोष्टींचा रोजच्या दिनक्रमात अंतर्भाव करणे हे देखील अप्रत्यक्षरीत्या रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत करत असते. मनाची प्रसन्नता ओज वाढवण्यास कारणीभूत असते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्यावरूनही ही गोष्ट सहज लक्षात येईल.
    दीर्घश्‍वसन, ॐकार गुंजन, अनुलोम-विलोम, प्राणायाम, व्यायाम यांच्या अभ्यासाने सर्व शरीरात प्राणाचे अभिसरण व्यवस्थित व्हायला लागले, की त्यामुळेही रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहते. “प्राणवहस्रोतसामध’चे काम नीट झाले, की त्यामुळे एकूणच आरोग्य नीट राहते हा अनेकांचा अनुभव असतो.
    घरात सकाळ-संध्याकाळ धूप करणे, नैसर्गिक सुगंधाच्या सान्निध्यात राहणे, आपल्या आसपास विशिष्ट वनस्पती, वृक्ष किंवा प्रभावयुक्‍त औषधे औषधी द्रव्ये असू देण्यामुळे सुद्धा रोगराईपासून दूर राहता येते.
    प्यायचे पाणी उकळून घेणे, चांदीच्या वा स्वच्छ तांब्याच्या भांड्यात पाणी साठवणे व पिणे, चांदीच्या ताटात जेवणे यांसारख्या साध्या साध्या गोष्टीही रोगप्रतिकारशक्‍ती नीट राहण्यास पूरक ठरतात.

    डॉ. श्री बालाजी तांबे

    मेदधातू शरीरात वाढल्यामुळे शरीराची एकंदर ताकद कमी होते आणि पर्यायाने अश्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असते.

    अतिकृश व्यक्तींमध्ये धातूचे प्रमाण कमी असल्याने त्यांची सुद्धा प्रतिकारशक्ती कमी असते.

    रक्त, पेशी आणि हाडे शिथिल असणाऱ्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असते.

    जन्मतःच दुर्बल असणाऱ्या व्यक्तीमध्ये ताकद कमी असल्याने सुद्धा तिची प्रतिकारशक्ती कमी असते.

    शरीरपोषणाचा कुठलाही विचार न करता आहार करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा प्रतिकारशक्ती कमी असते.

    प्रतिकारशक्ती चांगली असण्यासाठी सकस, पोषक आणि पुरेसे अन्न आवश्यक असते नाहीतर प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.

    मनाची शक्ती ही शरीरशक्तीपेक्षाही प्रभावी असते, मनाची शक्ती ही मोठमोठ्या आजारातून व्यक्तीला तारून नेऊ शकते.

  • केसांची काळजी

    केसांची काळजी

    तेलाने केस खरंच वाढतात का?

    केसांचे आरोग्य प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरते. केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग आणि तेल सांगितली आहेत. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होईल. त्यामुळे अमुक तेल लावले, की केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
    डोळे, दात, चेहऱ्याची ठेवण, त्वचेचा रंग वगैरे गोष्टी व्यक्‍तिविशिष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीत वेगवेगळ्या असतात. तसेच केसांची ठेवण, केसांची प्रत, केसांचा रंग तसेच केसांची लांबी वगैरे गोष्टीसुद्धा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरत असतात. म्हणूनच प्रकृतिपरीक्षणात “केस’ हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो.

    तेलाने केस वाढतात का हे समजण्यासाठी आधी केसांची मूलभूत माहिती घ्यायला हवी. आयुर्वेदाने केसांचा संबंध हाडांशी असतो असे सांगितले आहे.
    स्यात्‌ किट्टं केशलोमास्थ्नो ।
    …चरक चिकित्सास्थान
    अस्थिधातूचा मलभाग म्हणजे केस व रोम होत. अस्थिधातू तयार होतानाच केस तयार होतात व म्हणूनच केसांचा हाडांशी खूप जवळचा संबंध असतो. हाडे अशक्‍त झाली तर त्याचा केसांवर दुष्परिणाम होतो असेही आयुर्वेदात सांगितले आहे.
    केशलोमनखश्‍मश्रुद्विजप्रपतनं श्रमः ।
    ज्ञेयमस्थिक्षये लिं सन्धिशैथिल्यमेव च ।।
    ….. चरक सूत्रस्थान
    केस, रोम, नख, दाढी-मिशांचे केस गळणे तसेच दात तुटणे, फार परिश्रम न करताही थकवा जाणवणे, सांध्यांमध्ये शिथिलता जाणवणे ही सर्व लक्षणे हाडांचा क्षय झाल्यामुळे उद्‌भवतात.

    प्रकृतीनुसारही केस निरनिराळे असतात. कफप्रकृतीचे केस आदर्श म्हणावे असे असतात. दाट, मऊ, लांब व सहसा न गळणारे, न पिकणारे केस कफाचे असतात, पित्तप्रकृतीमध्ये केस गळण्याची, पिकण्याची प्रवृत्ती बरीच असते, तसेच पित्ताचे केस मऊ असले तरी फार दाट नसतात. वातप्रकृतीचे केस राठ असतात, केसांची टोके दुभंगणे, केस तुटणे व गळणे वगैरे लक्षणे वातप्रकृतीमध्ये दिसतात.
    आनुवंशिकतेचाही केसांशी संबंध असू शकतो. आजीचे, आईचे लांब केस असण्याची प्रवृत्ती असली तर मुलीचेही केस लांब असण्याची शक्‍यता मोठी असते, अर्थात आनुवंशिकता प्रकृतीमध्ये अंतर्भूत असतेच.

    या सर्व माहितीवरून लक्षात येऊ शकते की केसांवर प्रकृतीचा व हाडांचा मोठा प्रभाव असतो.

    केशवर्धनासाठी योग व तेले
    केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग दिलेले आहेत, अनेक तेलेही सांगितली आहेत की ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहील व केस वाढतील. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. अमुक तेल लावले की माझे केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
    बऱ्याचदा केसांच्या बाबतीत फक्‍त बाह्योपचार पुरेसे आहेत असे समजले जाते. अमुक तेल लावले, अमुक पदार्थ वापरून केस धुतले की चांगले राहतील, वाढतील अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र त्याहून अधिक महत्त्व अस्थिपोषक द्रव्ये घेण्याला असते. दूध, खारीक, शतावरी कल्प, नैसर्गिक कॅल्शियम असणारी शंखभस्म, प्रवाळभस्म, कुक्कुटाण्डत्वक्‌ यांसारखी द्रव्ये केसांच्या आरोग्यासाठी बाह्योपचारापेक्षा अधिक उपयुक्‍त असतात. बऱ्याचदा असे दिसते की हाडांशी संबंधित विकारांवर उपचार करत असता केसांमध्ये अनपेक्षित सुधारणा होताना दिसते किंवा च्यवनप्राश, सॅनरोझसारखी एकंदर प्रतिकारशक्‍ती वाढवणारी रसायने नियमित सेवन केली, प्रकृतीनुरूप आहार-आचरणाने दोष संतुलित ठेवता आले तर केस गळायचे थांबतात, काही लोकांचे अकाली पांढरे झालेले केस काळे होताना
    दिसतात.

    केसांची निगा राखण्यामध्ये तेल लावणे महत्त्वाचे असते यात संशय नाही. अस्थिधातू, केस हे शरीरघटक वाताच्या आधिपत्याखाली येतात आणि वात म्हटला की त्याला संतुलित ठेवण्यासाठी तेलासारखा दुसरा श्रेष्ठ उपचार नाही. केसांना तेल लावण्याने त्यांच्यातला वात नियंत्रित राहतो, अर्थातच केस तुटणे, कोरडे होणे, दुभंगणे, गळणे या सर्वांना प्रतिबंध होतो.
    केसांच्या मुळाशी तेल लावल्याने केस मजबूत व्हायला मदत मिळते. डोक्‍यात कोंडा होणे, खवडे होणे वगैरे त्रास सहसा होत नाहीत, मात्र हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेल चांगल्या प्रतीचे, केश्‍य म्हणजे केसांना हितकर द्रव्यांनी सिद्ध केलेले असावे लागते. असे सिद्ध तेल केसांच्या मुळांना लावले की लगेचच आतपर्यंत शोषले जाते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य नीट राहायला मदत मिळते. मात्र कच्चे तेल म्हणजे ज्याच्यावर अग्निसंस्कार झालेला नाही असे तेल कितीही शुद्ध असले, भेसळमुक्‍त असले तरी ते आतपर्यंत जिरण्यास अक्षम असल्याने केसांना तेलकटपणा आणण्याशिवाय फारसे उपयोगी पडत नाही. उलट केस तेलकट झाले की तेल काढून टाकण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून बनविलेले शांपू, साबण वापरावे लागतात, ज्यांचे वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात.

    केस निरोगी हवेत
    तेल लावण्याने केसांचे आरोग्य सुधारत असल्याने काही प्रमाणात केस लांब होण्यासाठीही फायदा होऊ शकतो; पण त्या लांब होण्याला प्रकृतीची, वयाची, एकंदर शरीरशक्‍तीची मर्यादा राहील हे लक्षात घ्यायला हवे.
    केसांच्या लांबीची चर्चा करताना एक गोष्ट समजून घ्यायला हवी की केस नुसतेच लांब असण्यापेक्षा ते निरोगी असणे अधिक महत्त्वाचे असते. मूळचे लांब केसही गळत असले, तुटत असले आणि निर्जीव दिसत असले तर आकर्षक वाटणे शक्‍य नसते. त्यामुळे केसांची नुसती लांबी वाढविण्याच्या मागे न लागता केस बळकट राहतील, छान तेजस्वी राहतील, काळे राहतील याकडे लक्ष द्यायला हवे.

    आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून उपाय
    केश्‍य द्रव्यांनी सिद्ध केलेले व आतपर्यंत जिरणारे “संतुलन व्हिलेज हेअर तेला’सारखे तेल केसांना नियमितपणे लावणे केसांसाठी उत्तम असते. कृत्रिम रंग, गंध घालून तयार केलेले तेल टाळणेच श्रेयस्कर होय.
    केस धुण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून तयार केलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिक द्रव्ये, उदा., शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरेंचे मिश्रण किंवा तयार “संतुलन सुकेशा’ वापरणे चांगले असते.
    आठवड्यातून दोन वेळा केस धुवावे.
    केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
    आठवड्यातून एकदा, केस धुण्याआधी केसांच्या मुळाशी लिंबाची फोड चोळून नंतर अर्धा तास कोरफडीचा गर लावून ठेवण्यानेही केसांचे आरोग्य चांगले राहते. केस गळणे, कोंडा होणे वगैरेंना प्रतिबंध होतो.
    आहारात दूध, खारीक, शतावरी कल्प, “कॅल्सिसॅन’, “सॅनरोझ’ वगैरेंचा समावेश असू द्यावा.
    उन्हात फिरताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी उपाय योजणे, उष्णतेजवळ किंवा संगणकावर काम असल्यास, रात्रीची जागरणे किंवा रात्रपाळी असल्यास पित्त कमी करण्यासाठी “सॅनकूल चूर्ण’, “संतुलन पित्तशांती गोळ्या’, नियमित पादाभ्यंग वगैरे उपाय योजणेही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते.

  • त्वचेची काळजी

    त्वचेची काळजी

    त्वचा हे एक नाजूक पण प्रभावी असे संरक्षक कवच असते. त्वचा शरीर आणि बाह्य वातावरण यांच्यामधली दुवा असते. तसेच शरीरात काय चालले आहे, दोष संतुलित आहेत की नाहीत, धातू संपन्न आहेत की नाहीत आणि मलांचे विसर्जन व्यवस्थित होते आहे की नाही हे अचूकपणे सांगणारा आरसाही असते. म्हणूनच त्वचेवर झालेला बदल त्रासदायक असला – नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही.
    प्रथमदर्शनीचा प्रभाव ज्या महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो, त्यातील एक म्हणजे त्वचा. बऱ्याचदा त्वचेचे सौंदर्य गोरा-सावळा-काळा अशा रंगात मोजले जाते. पण त्वचेची खरी आकर्षकता असते ती सतेजतेत. सावळ्या-काळ्या रंगाची त्वचाही सतेज असली, तर आकर्षक वाटते.
    त्वचा हा एक अवयव आहे आणि ती स्पर्शेन्द्रियाचे स्थानही आहे. दोन्ही दृष्टीने त्वचेची नीट काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. त्वचा हे एक नाजूक पण प्रभावी असे संरक्षक कवच असते. त्वचा शरीर आणि बाह्य वातावरण यांच्यामधली दुवा असते. तसेच शरीरात काय चालले आहे, दोष संतुलित आहेत की नाहीत, धातू संपन्न आहेत की नाहीत आणि मलांचे विसर्जन व्यवस्थित होते आहे की नाही हे अचूकपणे सांगणारा आरसाही असते. म्हणूनच त्वचेवर झालेला बदल त्रासदायक असला – नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही किंवा त्वचेवरील पुरळ, गळू, फोड वगैरे नुसतेच दाबून टाकणेही योग्य नाही. त्वचा खूप संवेदनशील असते. ऊन, उष्णता, रासायनिक पदार्थ, अति थंडी, जोराचा वारा वगैरे गोष्टींचा इतकेच नाही, तर मानसिक भावनांचाही त्वचेवर परिणाम होऊ शकतो. वयानुसार शरीरात जे बदल होत असतात, त्यानुसारही त्वचा बदलत जाते. उदा. मुलगा-मुलगी वयात येताना चेहऱ्यावर तारुण्यपीटिका येतात. स्त्रियांच्या बाबतीत बाळंतपणानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर चेहऱ्यावर वांग येऊ शकतात वगैरे. पण त्वचा निरोगी राहावी, सतेज राहावी यासाठी प्रयत्नशील राहता येते. तारुण्यात पदार्पण केल्याचे एक लक्षण म्हणून तारुण्यपीटिकांकडे पाहिले तरी त्यामुळे ऐन तारुण्यात तोंड लपविण्याची पाळी येऊ नये यासाठी नक्की प्रयत्न करता येतात.

    त्वचेची निर्मिती
    मुळात त्वचा कशी तयार होते हे आपण पाहू.
    गर्भे शुक्रशोणितस्याभिपच्यमानस्य क्षीरस्य संतानिका इव सप्त त्वचो भवन्ति ।…सुश्रुत शारीरस्थान

    ज्याप्रमाणे दूध तापत असता त्यावर साय येते, त्याप्रमाणे शुक्र व आर्तव म्हणजे पुरुषबीज व स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ बनत असताना त्वचा तयार होते. थोडक्‍यात त्वचेमध्ये सातही धातू अभिव्यक्‍त झालेले असतात. आणि म्हणूनच त्वचा आरोग्याचा आरसा असते.
    त्वचा निरोगी असणे म्हणजे नेमके काय हेही आयुर्वेदात सांगितलेले आहे,
    स्निग्धश्‍लक्ष्णमृदुश्‍लक्ष्णमृदुप्रसन्नसूक्ष्माल्पगम्भीरसुकुमारलोमा सप्रभेव त्वक्‌ चास्य भवति ।…चरक विमानस्थान

    स्निग्ध – त्वचा उचित प्रमाणात स्निग्ध असावी. अतिशय तेलकट त्वचाही चांगली नाही किंवा खूप कोरडी त्वचाही चांगली नाही. श्‍लक्ष्ण, मृदु – त्वचा मऊ व नाजूक असावी. अतिशय राकट, खरखरीत त्वचा असणे चांगले नाही.
    प्रसन्न – त्वचा प्रसन्न म्हणजे आकर्षक, बघितल्यावर प्रसन्नता देणारी असावी, काळवंडलेली नसावी, त्वचेवर कुठेही रॅश, पिटीका, फोड, डाग वगैरे नसावेत.
    सूक्ष्म – त्वचा पातळ असावी. खूप जाड, निबर त्वचा असणे आरोग्याचे लक्षण नाही.

    अल्प-गंभीर-सुकुमार-लोमा – त्वचेवरची लव अल्प असावी, खोलवर मूळ असलेली असावी आणि नाजूक सुकुमार अशी असावी.
    सप्रभा – सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्वचा सतेज असावी. रंग कोणताही असला तरी जर त्वचेवर सतेजता असली तर ती आकर्षकच वाटते.
    जखम लवकर भरून येणे आणि त्या ठिकाणची त्वचा बाजूच्या त्वचेच्या रंगासारखी होणे हे सुद्धा त्वचा निरोगी असण्याचे लक्षण असते. अजिबात घाम येत नसला किंवा नेहमीपेक्षा फारच अधिक प्रमाणात घाम येऊ लागला तर ते त्वचारोगाचे पूर्वरूप समजले जाते.

    आहार आणि आचार
    त्वचा निरोगी राहावी, आकर्षक असावी असे कोणाला वाटणार नाही? वय वाढले तरी त्याचा परिणाम त्वचेवर दिसू नये असे कोणाला वाटणार नाही? आहार-आचरणात थोडे पथ्य सांभाळले, थोडे नियम पाळले तर हे नक्कीच शक्‍य होईल. आहारातील अपथ्य आणि आचरणातील नियम पुढीलप्रमाणे होत.
    – दूध व फळे; मुगाची खिचडी व दूध; दूध व मीठ; दुधाबरोबर लसूण, मुळा, शेवग्याच्या शेंगा वगैरे पदार्थ एकत्र करून खाणे त्वचेसाठी अपथ्यकर होय.
    – रोज दही खाणे, मासे, अति प्रमाणात मीठ, अति प्रमाणात आंबट पदार्थ, तीळ, गवार, वांगे, ढोबळी मिरची, उडीद, शेतातले नवे अन्न या गोष्टी अपथ्यकर होय.
    – उन्हात फार वेळ राहण्यानेही त्वचा खराब होऊ शकते.
    – पोटभर जेवल्यावर लगेचच धावपळीचे काम किंवा व्यायाम करणे हे सुद्धा त्वचेसाठी अहितकर होय.
    – उलटीचा वेग दाबून ठेवल्यानेही त्वचा बिघडू शकते.
    – उन्हातून आल्यावर किंवा अन्य काही कारणाने शरीर तापले असताना लगेच थंड पाणी पिण्याने किंवा थंड पाण्याने स्नान करण्याने त्वचा खराब होऊ शकते.
    – दिवसा झोपण्याने सुद्धा त्वचारोग होऊ शकतात.
    – ज्ञानी, गुरुजनांचा अपमान करण्याने, चोरी-व्यभिचारादी वाईट कर्मे करण्यानेही त्वचा खराब होऊ शकते, असे आयुर्वेद सांगतो.

    त्वचेच्या आश्रयाने स्पर्शेन्द्रिय सुद्धा राहात असते. म्हणजे स्पर्शज्ञानाची महत्त्वाची जबाबदारीसुद्धा त्वचेवर असते. म्हणूनच सौंदर्य व आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी ज्यावर अवलंबून असतात, त्या त्वचेची काळजी आवर्जून घ्यायला हवी.

    सतेज त्वचेसाठी हे कराच!
    त्वचेसाठी हितावह असे काही साधे उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील.
    – दुधावरची साय त्वचेसाठी खूप चांगली असते. चेहरा, हात, मान वगैरे नाजूक त्वचा असणाऱ्या ठिकाणी १५-२० मिनिटांसाठी साय लावून नंतर कोमट पाण्याने धुणे.
    – झोपण्यापूर्वी नाकात साजूक तुपाचे किंवा औषधांनी सिद्ध तुपाचे थेंब टाकण्यानेही त्वचेचे आरोग्य, विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेचे आरोग्य चांगले राहायला मदत मिळते. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे वगैरे तक्रारींना प्रतिबंध होतो.
    – त्वचा कोरडी होणे, फुटणे, तळपाय-तळहाताला भेगा पडणे, त्वचा काळवंडणे, निस्तेज होणे, अकाली सुरकुतणे वगैरे त्रास वातदोषाच्या असंतुलनातून होत असतात. यावर आहारात दूध, लोणी वगैरे उचित स्निग्ध पदार्थांचा समावेश करणे, अभ्यंग, उटणे, नस्य वगैरे उपायांचा फायदा होतो.
    – त्वचा लालसर होणे, गांधी उठणे, चेहऱ्यावर वांग उठणे, पीटिका येणे, गळू होणे, तळहात-तळपायातून रक्‍त येणे वगैरे त्रास मुख्यत्वे पित्तदोषाच्या असंतुलनातून होऊ शकतात. यावर नियमित पादाभ्यंग, गुलकंद-मोरावळ्यासारख्या थंड गोष्टी खाणे, रात्री जागरणे न करणे वगैरे उपाय करता येतात.

    त्वचेमधले बिघाड हे बऱ्याचदा हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळेही होऊ शकतात. अशा वेळी मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ला घेणेच चांगले असते.

    अति ऊन, उष्णता वगैरे गोष्टीं त्वचेसाठी हानिकारक आहेत
    अति थंडी, जोराचा वारा वगैरे गोष्टीं त्वचेसाठी हानिकारक आहेत
    शक्यतो रासायनिक पदार्थ त्वचेवर लावणे टाळावे
    रात्री झोपण्यापूर्वी किंवा स्नानापूर्वी एक – दोन तास तेल जिरवावे

    सुगंधी वनस्पतींच्या उटण्याने स्नान करण्याने त्वचा सतेज होते, वर्ण उजळतो व त्वचारोगांना प्रतिबंध होतो

     स्नानाच्या आधी पाच – सात मिनिटांसाठी कोरफडीचा ताजा गर लावून ठेवता येतो.

    गर्भवतीचा आहार व बाळाची त्वचा
    त्वचा निरोगी राहावी, वर्ण उजळावा यासाठी सुरुवातीपासून काळजी घेता येते. अगदी गर्भवती स्त्रीच्या आहार-आचरणावर जन्मणाऱ्या बालकाच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. गर्भारपणात दूध, लोणी, तूप, पंचामृत, केशर, सुवर्णवर्ख, शहाळ्याचे पाणी, गोड व ताज्या फळांचे रस वगैरे गोष्टींचे नियमित सेवन करण्याने त्वचेची मूळ जडणघडण व्यवस्थित होण्यास मदत मिळते, त्वचेची सतेजता, नितळता व एकंदरच निरोगित्व सुधारू शकते. त्वचेला हितकर असणाऱ्या दूध, लोणी वगैरे गोष्टी एकंदर आरोग्यासाठीही चांगल्या असतात.

    – डॉ. श्री बालाजी तांबे

  • होलिकोत्सव

    होलिकोत्सव

    हिरण्यकश्‍यपूपासून नरसिंहापर्यंतच्या सर्व कथानकापासून जणू प्रेरणा घेऊन आयुर्वेदाने अनेक उपचारपद्धतींची योजना केली असावी. स्वेदन चिकित्सेचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत, पण होलिका उत्सवातील स्वेदन चिकित्सेला तोड नाही.

    उन्हाळा कोणालाच आवडत नाही. उष्णतेमुळे शरीरातील रस कमी होतो, आर्द्रता कमी होते. उष्णतेमुळे केवळ मनुष्याच्या शरीरातीलच नाही तर सर्व वनस्पतींमधील रसही कमी होतो. सूर्य मनुष्याच्या व वनस्पतींमधील रसाचे आकर्षण करून घेतो. जीवनरस कमी झाला की साहजिकच आयुष्यही कमी होते. झाडाची फांदी ओली असली की ती मोडायला त्रास होतो पण तीच फांदी वाळली की काडकन मोडते. उन्हाळ्यात घामाघूम होणे हा त्रास सर्वांनाच जाणवतो. त्यातून समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी, दमट हवेच्या ठिकाणी तर घामाचा त्रास सहन करण्याच्या पलीकडे असतो.

    खाल्लेल्या अन्नाचा, पेयांचे पचन झाल्यावर त्यातील मलभाग शरीराबाहेर टाकावाच लागतो. विष्ठा, मूत्र या रूपाने सर्वाधिक मलभाग बाहेर जातो परंतु कानात, नाकात येणारा मळ किंवा घाम हा सुद्धा बाहेर जावा लागतो. घाम येण्यामुळे शरीर थंड होण्यासाठी मदत मिळते. उष्णतेमुळे शरीरातील चलनवलन वाढले, रक्‍ताभिसरण वाढले व त्वचा प्रसरण पावली की घाम येणे सोपे होते.

    ह्याच तत्त्वाचा उपयोग करून शरीरात साठलेला मलभाग सैल करून घामाच्या माध्यमातून शरीराबाहेर घालवणे हा उपचार करता येतो. शरीरशुद्धीसाठी व कायाकल्पासाठी सांगितलेली पंचकर्म क्रिया म्हणजेच शरीरशुद्धीची प्रक्रिया. ह्यात विरेचनामार्फत, वमनामार्फत किंवा बस्तीमार्फत शरीर शुद्ध करता येते. परंतु मुळात त्यासाठी शरीरात लपलेला दोष, आमद्रव्य किंवा विष सैल करून मुख्य प्रवाहात आणून नंतर ते बाहेर ढकलणे आवश्‍यक असते. म्हणून शरीराला अभ्यंग करून स्वेदनपेटिकेचा उपयोग केला असता शरीराच्या त्वचेवरील रंध्रे उघडून त्यातून घामाद्वारे मलभाग बाहेर टाकता येतो. स्वेदनपेटिका म्हणजे एका बंद पेटिकेत व्यक्‍तीला डोके बाहेर राहील असे बसविल्यानंतर आत वाफ सोडली जाते. ही वाफ सर्व शरीरावर काम करते व स्वेदन होण्यास मदत करते. या वाफेत औषधी तेले टाकली तर अधिक उपयोग होताना दिसतो. सर्दी झालेली असताना सुंठ, गवती चहा, तुळशीची पाने वगैरे पाण्यात टाकून वाफारा घेतल्यास सर्दी वितळवून बाहेर काढता येते असा अनुभव सर्वांना असतोच.

    शिशिर ऋतूत साठलेला कफ पातळ होऊन वसंत ऋतूत बाहेर यायला लागला की होणारा त्रास सर्वांच्याच परिचयाचा असतो. हा त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेद व भारतीय संस्कृती यांनी एकत्रित विचार करून उपाययोजना म्हणून आयोजन केलेले आहे होलिका उत्सवाचे. तसेही सोप्या पद्धतीने, सामुदायिक रीत्या, अनेक लोकांना उपयोग होईल अशा प्रकारचे स्वेदन करण्यासाठी आयुर्वेदाने होळीत पेटविलेल्या अग्नीसारखीच व्यवस्था सुचविलेली आहे.

    सध्या आधुनिक सौना पद्धतीत संपूर्ण बंद खोलीत व्यक्‍तीला बसवून उष्णता निर्माण केली जाते वा वाफ सोडली जाते, पण हे आयुर्वेदाला मान्य नाही. कारण मूत्रपिंडांच्या ठिकाणी व डोक्‍याच्या भागाला कुठल्याही प्रकारे अधिक उष्णता लागू नये हा संकेत त्यात मोडला जातो. डोक्‍याला उष्णता लागू नये या हेतूने डोक्‍यावर ओला टॉवेल ठेवला तर एक वेगळाच उपद्रव होण्याची शक्‍यता असते. म्हणून उघड्या जागेत वर छत असेल पण मध्यभागी त्याला एक भोक उघडे ठेवलेले असेल व संपूर्ण गोलाकार सर्व बाजूंनी साधारणतः एक मीटरभर उंचीची भिंत बांधून व्यवस्थित आडोसा केलेला असेल अशा तऱ्हेने, मध्यभागी अग्नी पेटवून सर्वांनी अग्नीभोवती गोलाकार बसावे अशी योजना केलेली असते म्हणजे साधारणतः शरीराला व्यवस्थित उष्णता लागते. डोके रुमाल किंवा टोपीने झाकून ठेवायचे असते, तसेच जाड आवरण येईल असा रुमाल वगैरे मूत्रपिंडांच्या भोवती बांधून बसायचे असते.

    ही व्यवस्था म्हणजे आयुर्वेदाची एक होलिकोत्सवाची ही आवृत्ती आहे असे लक्षात येते. होळीच्या कथेतील होलिका राक्षसीला असा वर मिळालेला असतो की तुला अग्नीपासून भय नाही. म्हणून तिने प्रल्हादाला म्हणजे सात्त्विकतेला स्वतःच्या बरोबर घेऊन अग्नी पेटवून घेतला जेणेकरून प्रल्हादाला मृत्यू येईल ही कल्पना. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्‍यपूने होलिका राक्षसीबरोबर ठरविलेले हे षड्‌यंत्र होते. पण झाले भलतेच, प्रल्हाद जिवंत राहिला आणि होलिका मात्र जळून गेली. नेहमीच सात्त्विकता शिल्लक राहते व पाप नष्ट होते.

    याच प्रमाणे स्वेदनोपचाराद्वारे शरीरातील आवश्‍यक यंत्रणा शिल्लक राहते व दोष जळून जातात. 15-20 मिनिटे स्वेदन झाल्यावर शरीर कोरडे करून शांतपणे विश्रांती घ्यावी अशी अपेक्षा असते. स्वेदनाच्या वेळी आत किती तापमान असावे हे रुग्ण व उपचार करणाऱ्याने परिस्थिती पाहून ठरवायचे असते. तसेच वाफेबरोबर कुठले औषधी द्रव्य योजावे हे रुग्णाच्या प्रकृतीनुसार ठरविता येते. स्वेदनाचा फायदा प्रत्येक रुग्णाला होतो. स्वेदन हे एक पंचकर्मापूर्वीचे आवश्‍यक असलेले पूर्वकर्म आहे. परंतु विरेचन, वमनसहित पंचकर्म करायचे नसेल तरी अधून मधून बाष्पस्वेदन व अभ्यंग करण्याने तारुण्य राखण्यास किंवा आरोग्य राखण्यास खूप मदत होते.

    हिरण्यकश्‍यपूपासून नरसिंहापर्यंतच्या सर्व कथानकापासून जणू प्रेरणा घेऊन आयुर्वेदाने अनेक उपचारपद्धतींची योजना केली असावी. स्वेदन चिकित्सेचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत, पण होलिका उत्सवातील स्वेदन चिकित्सेला तोड नाही. तसेच रंगारंग उत्सवामुळे येणाऱ्या वसंतोत्सवाचे स्वागत करून नवतारुण्याच्या व चैतन्याच्या अनुभवाचा आनंद ही तर सर्वात मोठी चिकित्सा. फक्‍त उधळण्याचे रंग नैसर्गिकच असावेत.

  • डोळ्यांची काळजी

    डोळ्यांची काळजी

    आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार नेत्रदोष कोणत्या असंतुलनामुळे झाला आहे, हे लक्षात घेऊन उपचारांचे स्वरूप व कालावधी त्या अनुषंगाने बदलला जातो.
    डोळे म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय. जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी सर्वच इंद्रिये संपन्न असायला हवीत हे खरे असले तरी त्यातल्या त्यात डोळे अग्रणी ठरावेत. अष्टांगसंग्रहात डोळ्यांचे महत्त्व अशा प्रकारे सांगितले आहे,

    चक्षुरक्षायां सर्वकालं मनुष्यैःयत्नः कर्तव्यो जीविते यावदिच्छा ।व्यर्थो लोको।य़ं तुल्यरात्रिनिन्दवानांपुंसामन्धानां विद्यमाने।पि वित्ते ।।
    … अष्टांगसंग्रह उत्तरस्थान

    जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मनुष्याने डोळ्यांच्या रक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. अंध व्यक्‍तीजवळ धन-संपत्ती असली तरी त्याच्यासाठी दिवस व रात्र एकच असल्याने सर्वच व्यर्थ होते.

    डोळे अतिशय संवेदनशील तसेच नाजूक असतात. बाह्य वातावरण, शरीरातील दोष-धातूंची स्थिती एवढेच नाही तर मानसिक अवस्थेचाही डोळ्यांवर चांगला-वाईट परिणाम होत असतो. दृष्टी म्हणजेच दिसण्याची क्रिया योग्य असण्यासाठी दर्शनग्रहण करणारे चक्षुरेंद्रिय तर चांगले हवेच पण ते ज्या आधारे राहते ते डोळेरूपी अवयवही उत्तम असायला हवेत.

    चष्मा लागतो म्हणजेच दृष्टी किंवा नजर कमकुवत होते. यामागे अनेक बिघाड असू शकतात. या बिघाडांची अनेक कारणे असू शकतात. सगळेच बिघाड झटपट दूर होतील असे नाही पण आयुर्वेदशास्त्रात नेत्ररोगाची कारणे, प्रकार व उपचार यांची सविस्तर माहिती दिलेली आढळते.

    सुश्रुतसंहितेमध्ये ७६ प्रकारचे नेत्ररोग वर्णन केलेले आहेत, तर वाग्भटाचार्यांच्या मते ९४ प्रकारचे नेत्ररोग आहेत. नेत्रदोषाचे निदान करताना तो वातदोषातील बिघाडामुळे झाला आहे का पित्तदोषातील असंतुलनामुळे झाला आहे का कफदोष अति प्रमाणात वाढल्यामुळे झाला आहे हे मुख्यत्वाने पहावे लागते, तसेच रक्‍तात बिघाड झाल्याने, शरीरधातूंची ताकद कमी झाल्याने दृष्टी खालावते आहे का होही पाहावे लागते. अर्थातच उपचारांचे स्वरूप व उपचारांचा कालावधी त्या अनुषंगाने बदलत जातो.

    सर्वसाधारणपणे नेत्ररोगावर खालील प्रकारचे उपचार केले जातात.

    नेत्रबस्ती (नेत्रतर्पण) – यामध्ये उडदाच्या पिठाच्या सहायाने डोळ्यांभोवती पाळे तयार केले जाते व त्यात डोळा, पापण्या व पापण्यांचे केस बुडतील एवढ्या प्रमाणात औषधांनी सिद्ध केलेले तेल अथवा तूप भरले की डोळ्यांची उघडझाप करायची असते आणि साधारणपणे १५ ते २५ मिनिटांपर्यंत अशी नेत्रबस्ती घ्यायची असते. रोगाच्या अवस्थेनुसार ही नेत्रबस्ती रोज वा एक दिवसा आड घेता येते. नेत्रबस्तीमुळे डोळ्यांची ताकद तर वाढतेच पण दृष्टीही सुधारू शकते. नेत्रबस्तीत वापरलेल्या औषधी द्रव्यांचा परिणाम दृष्टिनाडीपर्यंत सुद्धा पोचू शकतो.

    नस्य – सिद्ध घृत वा तेल नाकामध्ये टाकणे म्हणजे नस्य होय. नाक, कान व डोळे ही तिन्ही इंद्रिये एकमेकांशी संबंधित असतात हे सर्वज्ञातच आहे. आयुर्वेदात तर या तिन्ही इंद्रियांचा शिरामध्ये ज्या एका बिंदूपाशी संयोग होतो त्याला “शृंगाटक मर्म’ अशी संज्ञा दिलेली आहे. नस्याद्वारे औषध शृंगाटक मर्मापर्यंत पोचले की त्याचा डोळ्यांवर, दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच दृष्टी सुधारण्यासाठी नस्य हा एक महत्त्वाचा उपचार असतो.

    शिरोबस्ती – नेत्रबस्तीमध्ये जसे डोळ्यांभोवती पाळे बांधले जाते, तसेच शिरोबस्तीमध्ये डोक्‍यावर उंच टोपी घातल्याप्रमाणे उडदाच्या पिठाच्या व चामड्याच्या साहाय्याने पाळे बांधले जाते व त्यात सिद्ध घृत वा सिद्ध तेल ३० ते ९० मिनिटांपर्यंत भरून धारण केले जाते. या उपचारांचा डोळ्यांशी प्रत्यक्ष संबंध येत नसला तरी प्रत्यक्षात त्याचा उपयोग दृष्टी सुधारण्यासाठी तसेच नेत्ररोगनिवारणासाठी होताना दिसतो.

    पुटपाक – नेत्रबस्तीप्रमाणेच या उपचारामध्ये वनस्पतीचा ताजा रस डोळ्यांवर धारण केला जातो. ज्या द्रव्यांचा रस निघत नाही अशा द्रव्यांचा रस पुटपाक पद्धतीने काढला जातो.

    अंजन – डोळ्यात काजळाप्रमाणे औषध घालणे म्हणजे अंजन करणे होय. अंजन ज्या द्रव्यांपासून बनविले जाते त्यानुसार त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य असते. काही अंजनांमुळे डोळ्यांचे प्रसादन होते म्हणजेच डोळ्यांचा थकवा दूर होतो. संगणक वगैरे प्रखर गोष्टींकडे सातत्याने बघितल्यामुळे येणारा डोळ्यांवरचा ताण नाहीसा होण्यास मदत मिळते. उदा. “सॅन अंजन -क्‍लिअर’. काही अंजनांमुळे डोळ्यातील अतिरिक्‍त कफ वाहून जातो व डोळे स्वच्छ होतात. उदा. रसांजन

    नेत्रधावन – त्रिफळा, लोध्र वगैरे द्रव्यांच्या काढ्याने डोळे धुणे म्हणजे नेत्रधावन. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, कंड, चिकटपणा वगैरे त्रास दूर होतात.

    वर्ती – डोळ्यांना व दृष्टीला हितकर असणारी द्रव्ये घोटून, वाळवून वातीप्रमाणे बारीक वर्ती (लांबुडकी मात्रा) केली जाते व ती मध, त्रिफळा काढा वगैरे द्रवात बुडवून डोळ्यामध्ये फिरवली जाते किंवा उगाळून घातली जाते. यामुळे डोळ्यांची शक्‍ती वाढते, विविध नेत्ररोग बरे होतात, दृष्टी सुधारण्यासाठी मदत मिळते.

    चक्षुष्य बस्ती – मध, तेल, शतपुष्पा, एरंडमूळ, ज्येष्ठमध वगैरे द्रव्यांपासून तयार केलेली चक्षुष्य बस्ती बस्तीरूपाने (आयुर्वेदिक एनिमा) घेण्यानेही दृष्टी सुधारायला मदत मिळते.

    डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी हे उपचार उत्तम असतातच, बरोबरीने डोळ्यांना हितकर द्रव्यांचे सेवन करण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो. त्रिफळा हे चूर्ण डोळ्यांसाठी उत्तम असते, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण मध व तुपासह घेणे हितकारक असते. त्रिफळा, दारुहळद वगैरे द्रव्यांपासून बनविलेले त्रिफळा घृत, जीवनीय गणातील औषधांचा विशेष संस्कार केलेले “संतुलन सुनयन घृत’ यांचाही नेत्ररोगावर खूप चांगला उपयोग होतो. नवायास लोह, रौप्य भस्म, मौक्‍तिक भस्म वगैरे औषधी योगही डोळ्यांसाठी उत्तम असतात.

    नेत्ररोग झाल्यावर किंवा चष्मा लागल्यावर उपचार करण्यापेक्षा डोळे निरोगी राहण्यासाठी अगोदरपासून काळजी घेणे निश्‍चितच चांगले असते. त्यादृष्टीने डोळ्यात आयुर्वेदिक अंजन घालणे, नेत्र्य द्रव्यानी सिद्ध तेल उदा., “संतुलन सुनयन तेल’ टाकणे, पादाभ्यंग करणे, तोंडात थोडे पाणी घेऊन व गाल फुगवून बंद डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारणे, जेवणानंतर दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घासून डोळ्यांना लावणे यासारखे साधे सोपे पण प्रभावी उपचार करता येतात.

    डोळ्यांसाठी विशेष हितकर पदार्थ – मूग, जव, लाल तांदूळ, जुने तूप, कुळीथ सूप, पेज, कण्हेरी, गाजर, मेथी, पालक, पपई, सुरण, परवर, वांगे, काकडी, मुळा, मनुका, गाईचे दूध, तूप, साखर, धणे, सैंधव, मध, वगैरे आहारातील गोष्टी; पुनर्नवा, माका, कोरफड, त्रिफळा, चंदन, कापूर, लोध्र वगैरे औषधी द्वव्ये.

    डोळ्यांसाठी अहितकर गोष्टी – क्रोध, शोक, मैथुन, अश्रू-वायू-मूत्र वगैरे वेगांचा अवरोध करणे, रात्री जड भोजन करणे, सातत्याने उन्हात किंवा उष्णतेसन्निध राहणे, फार बोलणे, वमन, अतिजलपान, दही, पालेभाज्या, टरबूज, मोड आणलेली कडधान्ये, मासे, मद्य, पाण्यातील प्राणी, मीठ, अतिशय तिखट, अतिशय आंबट व जड अन्नपान, मोहरीचे तेल, रात्रीचे जागरण वगैरे.

    डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी

    रात्री उशिरापर्यंत जागू नये, लवकर झोपावे. रात्री नाकात साजूक तुपाचे थेंब टाकावेत.

    टी.व्ही., संगणकाचा स्क्रीनकडे सतत पाहू नये.

    मोबाईल वा तेजस्वी प्रकाशाकडे सतत पाहू नये.

    शुद्ध आयुर्वेदिक काजळ (सौंदर्य प्रसाधनातील नव्हे), अंजन नित्य वापरावे. पुरुषांना काळे काजळ घालणे योग्य वाटत नसले तर “संतुलन काजळ- क्‍लिअर’ वापरावे. “संतुलन सुनयन घृता’ सारखे योग नियमित वापरावेत.

    दूध, लोणी, गाजर, मेथी, पालक, पपई वगैरे भाजीपाला व फळे आहारात अवश्‍य सेवन करावे.

  • ‘बालगुटी’

    ‘बालगुटी’

    बाळाला दहाव्या दिवसापासून गुटी द्यायला सुरुवात करावी.  ‘बालगुटी’ हे आयुर्वेदिक शास्त्रावर आधारलेले व परंपरेने चालत आलेले सहस्त्रशः सिद्ध असे लहान आहे. याने बाळाचे पचन चांगले राहते. पोट रोज आणि नियमितपणे आफ व्हायला मदत मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने सर्दी, खोकला, तापासरखे छोटे छोटे त्रास होण्यास प्रतिबंध होतो. शरीराचे पोषण झाल्याने वजन वाढायला व एकंदर  आकस व्हायलाही मदत मिळते. बाळगुटीमधली द्रव्ये आईच्या दुधात उगाळून देणे सर्वात चांगले. अन्यथा वर उल्लेखलेल्या सुवर्णसिद्धजलात ती उगाळून द्यावीत. ही द्रव्ये अखंड असावीत आणि उगाळून झाल्यावर नीट पुसून कोरडी कायु  हवाबंद डब्यात ठेवावीत. बाळगुटी पहिले आठ महिने द्यावीच द्यावी. मात्र नंतरही शक्य असल्यास वर्ष- सव्वा वर्षापर्यंत गुटी देणे बाळाच्या एकंदर आरोग्य आणि विकासाच्या दृष्टीने उत्तम होय. बालगुटीमध्ये पचन सुधारणारी, मेंदूची ताकद वाढवणारी, जंतांची प्रवृत्ती कमी करणारी, हाडांना बळकट करणारी अशी विविध प्रकारची द्रव्ये असतात.  दहा दिवसांच्या बाळाला गुटी सुरू करताना प्रत्येक द्रव्याचे साधारणतः रुपयाच्या आकाराचे एक-दोन वळसे द्यावेत. बालक महिन्याचे झाल्यावर दोन-तीन वळसे द्यावेत, ५-६ महिन्यांचे होईपर्यंत सात- आठ वळसे द्यावेत व या प्रकारे हळू हळू वळश्यांचे प्रमाण प्रमाण वाढवत न्यावेत. बालकाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत असल्यास त्यावर उपयोगी असणाऱ्या द्रव्याची मात्रा त्याला बरे वाटेपर्यंत थोडीफार वाढवावी.

    बाळगुटीत साधारणतः मुरुडशेंग, हिरडा, पिंपळी, बेहडा, हळद, सागरगोटा, वेखंड, जायफळ, कायफळ, मायफळ, सुंठ, काकडशिंगी, ज्येष्ठमध, डिकेमाली, वावडिंग, अतिविषा, नागरमोथा, कुडा, अश्वगंधा, खारीक व बदाम ही द्रव्ये असतात. याची सविस्तर माहिती परिशिष्टात दिलेली आहे.सर्व द्रव्ये असलेला बालगुटीचा संच बाजारात उपलब्ध असतो, मात्र ती सर्व द्रव्ये चांगल्या प्रतीची आहेत याची खात्री करावी., तसेच बाजारात सर्व द्रव्ये एकत्र करून बनवलेली तयार बाळगुटीदेखील मिळते, मात्र अशी तयार बाळगुटी वापरण्यापेक्षा वेगवेगळी द्रव्ये घेऊन उगाळणे सर्वात चांगले. कारण बाळाला असलेल्या त्रासाप्रमाणे द्रव्यांची मात्रा कमी-अधिक करता येते, जे एकत्र केलेल्या गुटीत शक्य नसते. या एकत्रित गुटीबरोबर बदाम, खारीक उगाळून देणे आवश्यक असते.बालक बुद्धीसंपन्न व प्रज्ञासंपन्न होण्यासाठी ब्राह्मी, जटामांसी वगैरे मेंदूला पोषक औषधांनी सिद्ध केलेले ‘ब्रह्मलीन घृता’चे लेहन देणेही उत्तम. यात चवीसाठी दोन थेंब मध घातला तरी चालू शकते.बाळाला दात नसल्याने ही सर्व लेह्य औषधे फार उपयोगी पडतात. जसजसे बाळाला दात यायला लागतात, तसतसे बाळाच्या आहार आणि औषधांचे स्वरूप थोडे बदलायला लागते.

     

    blog icon_1

    अगदी लहान बाळांची पचन शक्ती सुद्धा शिशु अवस्थेत असते. बाळगुटीमुळे बाळाची पचनक्रिया चांगली राहाते.

    blog icon_2

    बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी पोट रोज आणि नियमितपणे राहणे आवश्यक असते. बाळगुटी मुळे बाळाचे पोट नियमितपणे साफ व्हायला मदत होते.

    blog icon_3

    बाळगुटीमुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे सर्दी, खोकला व ताप येणे आदी छोटे छोटे त्रास होण्यापासून बाळाचे संरक्षण होते.

    blog icon_4

    बाळगुटीमुळे बाळाच्या शरीराचे उत्तम पोषण होते. त्यामुळे एकंदर विकास होण्यासाठी मदत होते.

    blog icon_5

    बाळाच्या विकासात बाळाचे योग्य वजन वाढणे आवश्यक असते. बाळगुटी मुळे हे साध्य होते.

    blog icon_6

    बाळगुटीमुळे बाळाच्या सर्वांगीण विकासात मदत होते.

    blog icon_7

    बाळगुटीमुळे मेंदूचा विकास व बाळाची बौद्धिक वाढ होण्यास मदत होते.

    blog icon_8

    बाळगुटी मध्ये बाळाच्या हाडांना बळकटी देणारी द्रव्ये असतात. त्यामुळे बाळाच्या हाडांचा सुयोग्य विकास होतो

    post_9A
    post_10B
    post_26
    post_27
  • बेबी मसाज पावडर

    बेबी मसाज पावडर

    अभ्यंग – बाळाला रोज तेलाचा अभ्यंग करावा. यासाठी औषधांनी सिद्ध केलेले ‘संतुलन बेबी मसाज तेल’ उत्तम ठरते. सकाळी अंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला हलक्या हाताने तेल लावावे. तेल लावताना फार जोर लावू नये, रगडण्यामुळे किंवा फार जोर दिल्याने बाळाला त्रास होऊ शकतो. बाळाला खेळवत हळुवार हातांनी व मायेेने तेल लावल्यास बाळालाही तेल लावून घेणे आवडते. बाळाला पायावर घेऊन तेल लावणे सगळ्यात सोपे असते, मात्र तसे न जमल्यास त्याला मऊ दुपट्यावर ठेवून तेल लावले तरी चालते.

    सर्वप्रथम, व्यवस्थित जिरेल अशा पद्धतीने टाळूवर तेल थापावे. नाभीमध्ये दोन-तीन थेंब तेल सोडावे, तसेच कानामध्ये प्रत्येकी दोन-तीन थेंब टाकावेत. तेल लावण्याची सुरुवात पायापासून करावी आणि तेल लावताना पायाच्या तळव्यापासून वर मांडीपर्यंत, हाताच्या तळव्यापासून वर दंडापर्यंत याप्रमाणे दिशा ठेवावी. पाठीसही खालून वर व पोटावर घड्याळाच्या दिशेने गोलाकार हात फिरवीत तेल लावावे. तेल कोमट असलेले चांगले. किमान पावसाळ्यात व हिवाळ्यात तरी तेल कोमट करूनच वापरावे. तेल लावल्यावर बाळाला साधारणपणे अर्ध्या तासानंतर अंघोळ घालावी. याप्रकारे नियमित अभ्यंग केल्यास बाळाची हाडे व स्नायू बळकट व्हायला मदत होते; त्वचा कोमल आणि सतेज होते; शरीराची वाढ व्यवस्थित होते; एकंदर प्रतकारशक्ती वाढते आणि झोप शांत यायलाही मदत मिळते. विशेषतः संध्याकाळी पुन्हा एकदा तेल लावल्याने शांत झोप यायला मदत मिळते.

    खरे तर बाळाला पहिली दोन वर्षे नियमित अभ्यंग करणे चांगले; पण किमान पहिले आठ-नऊ महिने तरी रोज अभ्यंग करावा. नंतरही पाच वर्षांपर्यंत आठवड्यातून एक-दोन वेळा अभ्यंग करणे चांगले.

    बाळाच्या अंघोळीचे पाणी फार गरम किंवा फार गार नसावे. बाळाची त्वचा नाजूक आणि अतिशय संवेदनशील असल्याने साबणाऐवजी उटणे लावणे अधिक चांगले. चंदन, अनंतमूळ, हळद, बेसन किंवा मसुराचे पीठ यांचे वस्त्रगाळ मिश्रण किंवा तयार ‘संतुलन बेबी मसाज पावडर’ साय किंवा दुधात मिसळून अंघोळीच्या वेळेला बाळाच्या अंगाला लावावी. अभ्यंग करताना, तसेच बाळाला अंघोळ घालताना बाळाच्या अंगावर वाऱ्याचा झोत येणार नाही याकडे लक्ष ठेवावे. अंघोळ झाल्यावर लगेच मऊ सुती वस्त्राने बाळाचे अंग हलक्या हाताने टिपून घ्यावे.

    संतुलन बेबी मसाज पावडर – बाळाच्या कोमल व नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठी हे खास उटणे आहे. अनंतमूळ, गुलाबाच्या पाकळ्या, चंदन व जातकर्मसंस्कारात सांगितलेल्या अष्टगंधातील काही खास द्रव्यांपासून तयार केलेले हे उटणे स्नानाच्या वेळेला साय किंवा दुधात मिसळून बाळाच्या अंगाला लावावे (साबणाऐवजी). याच्या नियमित वृापराने त्वचा उजळते, पुरळ, रॅश, ॲलर्जी वगैरे त्रास होत नाहीत. तसेच साबणातील रासायनिक द्रव्यांमुळे होऊ शकणारा अपाय टाळता येतो.