Author: Shriguru Dr. Balaji Tambe

  • च्यवनप्राश

    च्यवनप्राश

    च्यवनप्राश या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते. च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे.

    चरकसंहितेमध्ये आवळ्यापासून बनविलेली निरनिराळी रसायने सांगताना सुरुवातीला सांगितलेले आहे,

    करत्रचितानां यथोक्‍तगुणानाम्‌ आमलकानां उद्‌धृनास्थ्नां
    शुष्कचूर्णितानां पुनर्मार्थे फाल्गुने वा मासे ।
    …चरक चिकित्सास्थान

    कार्तिक महिन्याच्या शेवटापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत जेव्हा आवळा आपल्या रस, वीर्याने परिपूर्ण झालेला असतो, तेव्हा झाडावरून हाताने तोडून गोळा करावा.

    याठिकाणी लक्षात घ्यायची मुख्य गोष्ट म्हणजे झाडावर उत्तम पोसला गेलेला, रस-वीर्याने परिपूर्ण झालेला आवळाच औषधात वापरणे अपेक्षित असते. पूर्ण वाढ होण्यापूर्वीच झाडावरून गळून पडलेले आवळे वापरणे योग्य नाही. याशिवाय उत्तम कसदार जमिनीमध्ये तयार झालेला, गंध, रूप व चव उत्तम असलेला, पुरेसा रस असलेला आवळाच रसायन म्हणून वापरण्यास योग्य असतो, असेही ग्रंथकार सांगतात.

    च्यवनप्राश तयार करताना पूर्ण तयार झालेला व रसरशीत आवळा वापरावा असे सांगितलेले असते, आवळ्याचे चूर्ण करायचे असले तर ताज्या आवळ्यातून बी काढून मग वाळवून चूर्ण करावे असे सांगितलेले असते.

    आवळ्याच्या दोन जाती असतात, मोठा आवळा व रान आवळा. मोठा आवळा चवीला आंबट, गोड, रसरशीत असतो व औषधात वापरला जातो. रान आवळे मात्र आकाराने लहान असून चवीला तुरट, कडवट व कोरडे असतात. हे आवळे औषधासाठी वापरणे योग्य नव्हे. रायआवळा म्हणून अतिशय आंबट छोटे फळ मिळते पण नावात साधर्म्य असले तरी त्याचा रसायन आवळ्याशी काही संबंध नसतो.

    आयुर्वेदात आमलकी, धात्री, वगैरे नावांनी ओळखला जाणारा आवळा हे एक सुलभतेने उपलब्ध असणारे उत्कृष्ट रसायनद्रव्य आहे.

    वृष्यं रसायनं रुच्यं त्रिदोषघ्नं विशेषतः ।
    वमनप्रमेहशोफपित्तास्र श्रमविबन्धाध्मान विष्टम्भघ्नम्‌ ।।
    …धन्वंतरी निघण्टु

    आवळा शुक्रधातूला पोषक, रसायन गुणांनी परिपूर्ण असतो, रुची वाढविणारा असतो; त्रिदोषांचे संतुलन करण्यास समर्थ असतो, विशेषतः पित्तदोषाचे शमन करतो; ताप, दाह, उलटी, प्रमेह, शोथ, रक्‍तपित्त, श्रम, मलावष्टंभ, पोटफुगी वगैरेंसाठी औषध म्हणून उपयुक्‍त असतो. “इदं वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌’ असेही चरकसंहितेमध्ये म्हटलेले आहे. वय वाढले तरी त्यामुळे होणारी शरीराची झीज कमीत कमी प्रमाणात व्हावी किंवा तारुण्य टिकविणारे द्रव्य म्हणजे वयःस्थापन द्रव्य होय. आवळा हा नुसते वयःस्थापन करतो असे नाही तर तो अशा प्रकारच्या द्रव्यात श्रेष्ठ, सर्वोत्तम समजला जातो, यावरूनच आवळ्याची महती लक्षात येते.

    म्हणूनच आवळा असंख्य रसायनांमध्ये प्रयुक्‍त केलेला आहे. च्यवनप्राश या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते हे बहुतेक जणांना माहिती असते. आयुर्वेदाच्या संहितांमध्ये आमलकायस, ब्राह्मरसायन, केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अशी अनेक रसायने आहेत की जी मुख्यत्वे आवळ्यापासून तयार केलेली असतात. चरक, शारंगधर बहुतेक संहितांमध्ये च्यवनप्राश अवलेह वर्णन केलेला आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरलेली द्रव्ये तर उत्तम प्रतीची असावी लागतातच व बरोबरीने च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. च्यवनप्राश अतिशय प्रसिद्ध असल्याने आजकाल अनेक जण तो बनवितात, पण त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे.

    च्यवनप्राश बनविण्याची कृती
    1. रसरशीत ताजे आवळे निवडून पाण्याने स्वच्छ धुवावे व नंतर रात्रभर पाण्यात भिजत घालावेत (पाण्यात थोडेसे मीठ घालावे).
    2. सूचीतील 1 ते 33 द्रव्यांचे बारीक तुकडे करून रात्रभर पाण्यात भिजत घालावे.
    3. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवळे पाण्यातून काढून पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवावेत. सर्व आवळे सुती कापडात बांधून पोटली तयार करावी. भिजलेल्या सर्व वनस्पती पाण्यात कुस्करून घ्याव्यात.
    4. साधारण 20 लिटर पाणी घेऊन या सर्व वनस्पती त्यात घालून काढा बनविण्यासाठी मंद आचेवर ठेवणे. यावेळी आवळ्यांची पोटली अधांतरी लटकत ठेवावी.
    5. आवळे शिजल्यावर पोटली बाहेर काढून घ्यावी.
    6. एकीकडे मंद आचेवर काढा उकळणे सुरू ठेवावे.
    7. शिजलेल्या आवळ्यांमधून बिया काढून टाकाव्या.
    8. आवळ्याच्या फोडी 40 मेशच्या स्टेनलेस स्टीलच्या चाळणीवर अथवा सुती कपड्यावर घासून आवळ्याच्या गरातील धागे काढून टाकून बी-विरहित व धागेविरहित गर जमा करावा. या गरालाच मावा म्हणतात.
    9. योग्य आकाराच्या जाड बुडाच्या स्टेनलेस स्टीलच्या किंवा कल्हई असलेल्या पातेल्यात तेल व तुपावर मंद आचेवर पाण्याचा अंश उडून जाईपर्यंत मावा परतावा. यावेळी मावा करपणार नाही वा इकडे तिकडे उडणार नाही अशी काळजी घेणे आवश्‍यक असते.
    10. एका बाजूला काढा साधारण एक चतुर्थांश होईपर्यंत उकळावा.
    11. तयार झालेला काढा कापडातून गाळून घ्यावा व काढ्याची द्रव्ये बाजूला टाकून द्यावी.
    12. गाळलेला काढा साधारण घट्ट होईपर्यंत उकळवत ठेवावा.
    13. साखरेचा पाक करून घ्यावा.
    14. साखरेचा पाक, घट्ट केलेला काढा व आवळ्याचा परतलेला मावा एकत्र करून हे सर्व मिश्रण मंद आचेवर ठेवून चाटण-अवलेह होईपर्यंत ठेवावा. यावेळी अवलेह करपणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते.
    15. जवळ जवळ अवलेह तयार होत आला आहे असे वाटले की प्रक्षेप द्रव्ये घालावीत व सर्व मिश्रण एकजीव करावे.
    16. अवलेह साधारण गार झाल्यावर त्यात मध घालून नीट एकत्र करावे.
    17. च्यवनप्राशची गुणवत्ता व प्रभाव वाढविण्यासाठी सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख वसंतमालिनी, मकरध्वज वगैरे द्रव्ये मधात मिसळून टाकता येतात.
    18. तयार झालेला च्यवनप्राश योग्य आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवावा व आवश्‍यकतेप्रमाणे वर्षभर वापरावा.

    सूचना
    आवळे आम्ल रसाचे असल्यामुळे च्यवनप्राश बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत ऍल्युमिनियम वा हिंदालियमची भांडी, चमचे, झाकण्या वापरू नये.
    अशा प्रकारे तयार केलेला च्यवनप्राश दीर्घकाळ टिकू शकतो व रस या गुणांनी परिपूर्ण असतो. च्यवनप्राशची उपयुक्‍तता आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याप्रकारे सांगितलेली आहे, मेधा, स्मृती, आकलनशक्‍ती चांगली राहते; कांती, वर्ण, त्वचा उजळते, तेजस्विता येते; मन प्रसन्न राहते; हृद्रोग, खोकला, दमा, तृष्णा, वातरक्‍त, उरोग्रह, शुक्रदोष, मूत्रदोष, विविध वात-पित्त विकारांवर च्यवनप्राश उपयुक्‍त असतो. रसायन म्हणून सेवन केल्यास मनुष्य अकाली वृद्धत्वापासून तसेच सर्व रोगांपासून दूर राहू शकतो.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • लठ्ठपणा

    लठ्ठपणा

    व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते.

    कितीही प्रयत्न केले तरी वाढलेले वजन कमी होत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. काही जणांचा असाही अनुभव असतो, की आटोकाट प्रयत्न करून थोडे वजन कमी झाले तरी तसेच राहत नाही; पुन्हा वाढते आणि उलट पूर्वीपेक्षा अजूनच वाढते. लठ्ठपणा हा वरवर पाहता खूप त्रासदायक, वेदनादायक विकार नसला तरी त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन चरकसंहितेमध्ये अतिलठ्ठपणा ही निंद्य अवस्था असते असे सांगितले आहे.

    एका बाजूने मेद कमी करायचा ठरविले तरी दुसऱ्या बाजूने वातदोष वाढणार नाही, वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराची ताकद, उत्साह, सतेजता लोप पावणार नाही, याचे भान ठेवावे लागते आणि त्यासाठी आहार, आचरण, औषध व उपचार ही चतुःसूत्री पाळणे आवश्‍यक असते. यापैकी आहाराबाबतची सविस्तर माहिती आपण मागच्या वेळेला घेतली आहे. लठ्ठपणा असल्यास आचरणामध्ये आयुर्वेदाने सुचविलेले मुख्य मुद्दे याप्रमाणे होत,

    • अस्वप्न – कमी झोप
    • चिंतन – मानसिक व्यग्रता
    • आतपसेवन – उन्हाचा संपर्क
    • शारीरिक व्यायाम
    • अध्व – पायी चालणे

    कमी झोप सुचवण्यामागे रात्रीची झोप कमीत कमी, जितकी आवश्‍यक आहे तेवढीच घेणे आणि दुपारी अजिबात न झोपणे, या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. कधीतरी जागरण झाले तरी चालू शकेल, पण झोप झाली तरी लोळत राहणे, सूर्योदयानंतरही झोपून राहणे, जेवणानंतर विश्रांती म्हणून झोपून जाणे, या गोष्टी टाळायला हव्यात.

    मानसिक पातळीवर आळस येऊ नये, आरामाची प्रवृत्ती बळावू नये, हेसुद्धा लठ्ठपणावरील उपचारांत सांभाळावे लागते. मन कामात व्यस्त राहिले, चिंतन करण्याजोग्या गोष्टीत गुंतून राहिले तर त्याचाही वजन कमी होण्यासाठी उपयोग होतो.

    थोडा वेळ उन्हात बसणे हा लंघनानाच एक प्रकार असतो. सकाळी आठच्या आधी किंवा संध्याकाळी पाचनंतर कोवळे ऊन अंगावर घेण्यानेसुद्धा वजन कमी होण्यास मदत मिळते. अगोदर अंगाला तेल लावून, सकाळच्या उन्हात सूर्यनमस्कार घालणे, हा त्यातला सर्वोत्कृष्ट उपचार म्हणता येईल.

    व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. व्यायामाच्या बाबतीतला एक अनुभव असा, की प्रकृतीला अनुरूप असणारे, सहज करता येण्याजोगे, न थकवणारे व्यायाम करणेच हितावह असते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते.

    योग्य औषधयोजना हीसुद्धा वजन कमी होण्यास सहायक असते. सहसा ही औषधे मेदाचे लेखन (अवाजवी मेद खरवडून काढणे) करण्याबरोबरीने वाताचे शमन करणारी, पचन सुधारणारी असतात. उदा.- गुग्गुळ, वावडिंग, त्रिफळा, नागरमोथा, चित्रक, सुंठ वगैरे. फक्‍त मेदनलेखन इतकाच उद्देश ठेवला व कडू, तुरट चवीच्या द्रव्यांचा भडिमार केला तर त्यामुळे वात वाढतो व अजूनच समस्या निर्माण होऊ शकतात. अमुक एक पेय प्या व वजन कमी करा, महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी करा, या प्रकारे दावे करणाऱ्या बहुतेक औषधांमध्ये कडू, तिखट, तुरट द्रव्यांचा समावेश असतो, याचे भान ठेवायला हवे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीपरीक्षण करून घेऊन योग्य औषध सुरू करणे सर्वोत्तम असते. मात्र तत्पूर्वी लगेच सुरू करता येतील अशी काही घरगुती औषधे पुढीलप्रमाणे आहेत-

    • “काथ’ हा वजन कमी करण्यासाठी उत्तम असतो. चांगल्या प्रतीच्या काथाचे दीड ते दोन ग्रॅम चूर्ण रोज पाण्याबरोबर व विड्याच्या पानाबरोबर घेण्याने वजन कमी होण्यास मदत होते.
    • जेवणानंतर दोन चमचे लिंबाचा रस एक कपभर पाण्यात घेण्यानेसुद्धा मेद कमी होण्यास मदत मिळते.
    • सकाळी उठल्यावर कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या पाण्यात चमचाभर मध टाकून घेण्यानेही वजन कमी होण्यास मदत मिळते.
    • माक्‍याचा रस मेद साठलेल्या ठिकाणी हलक्‍या हाताने जिरवला तर त्यामुळे वजन कमी होण्यास, विशेषतः मेदाच्या गाठी तयार झालेल्या असल्यास त्या वितळण्यास मदत मिळते.

    उद्वर्तन – उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।
    …अष्टांगहृदय सूत्रस्थान कफदोष कमी करून साठलेल्या मेदाला वितळविण्यासाठी उद्वर्तन उपचार उत्तम होय. उद्वर्तन म्हणजे विशिष्ट द्रव्यांचे बारीक चूर्ण संपूर्ण अंगाला ठराविक पद्धतीने चोळणे. अभ्यंगासारखा हासुद्धा एक मसाजच असतो, फक्‍त यात तेलाऐवजी बारीक चूर्ण वापरले जाते. घरच्या घरी स्नानाच्या आधी उटणे अंगाला लावतात, त्याप्रमाणे उद्वर्तनाचे कोरडे चूर्ण चोळता येते. मात्र तज्ज्ञ परिचारकाकाडून व्यवस्थित उद्वर्तन करून घेण्याचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होताना दिसतो.

    शरीरशुद्धी – वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी. शरीरशुद्धी म्हणजे शरीरातील अनावश्‍यक गोष्टी अति प्रमाणात साठल्याने दोषरूप झालेले भाव शरीराबाहेर काढून टाकणे. लठ्ठपणामध्ये साठून राहिलेला “मेद’ हा मुळात धातू असला तरी अतिप्रमाणात वाढला की दोषच म्हणावा लागतो. शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी केली असता असा दोषस्वरूप मेद कमी होऊ शकते. याबाबतचा अनुभव असा, की जेवढे वजन कमी होणे अपेक्षित आहे, ते सर्वच्या सर्व पंचकर्माच्या कालावधीत कमी होईलच असे नसते. उदा.- एखाद्या व्यक्‍तीचे वजन 20 किलो अधिक असले तर शास्त्रोक्‍त विरेचन, विशेष मेदनाशक तेलाचा बस्ती, अभ्यंग, उद्वर्तन, स्वेदन वगैरे उपचारांच्या साह्याने पंचकर्माच्या दरम्यान 6-8 किलो वजन कमी झाले तरी शरीरशुद्धीद्वारा एकदा आतील मेदसंचयाची प्रवृत्ती बदलली, आहार-आचरणामध्ये अनुकूल बदल केले, की पंचकर्मानंतरही क्रमाक्रमाने वजन कमी होताना दिसते. एकाएकी वजन कमी होण्याने शरीरावर होऊ शकणारे दुष्परिणाम यात होत नाहीत, शिवाय अशा प्रकारे हळू हळू उतरलेले वजन सहसा पुन्हा वाढतही नाही.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • क्षयरोग (टी बी)

    क्षयरोग (टी बी)

    अश्‍विन महिन्यातील द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी. याच दिवसाला म्हणतात वसुबारस. गोठा साफ करून त्यात हव्या असलेल्या सुधारणा करून, गुरे स्वच्छ करून, गोठ्यात धूप जाळून वसुबारसेच्या दिवशी गोठ्यात सवत्स गाईची पूजा केली जाते. परंतु, अशा रीतीने फक्‍त एक दिवस गोठा स्वच्छ ठेवला तर काम भागेल का? गुरे म्हणजे कुटुंबातील एक घटक आहे असे समजून त्यांच्याकडे पूर्वीच्या काळी लक्ष दिले जात असे. गुरांना जेथे ठेवत ती जागाही भरपूर मोठी असे. गलिच्छ गोठे क्वचित प्रसंगीच पाहायला मिळत असत. परंतु माणसाचा आळस व लोभ वाढल्याने कमी जागेत अधिक गुरे ठेवली गेल्याने गोठ्यात स्वच्छता राहीनाशी झाली.

    ही सर्व चर्चा कशासाठी, तर क्षय हा रोग संसर्जजन्य असून तो गुरांकडून येतो असे समजले जाते. पूर्वीच्या काळी क्षय हा एक जीवघेणा आजार होता, पण गेल्या काही वर्षात क्षयावरच्या रोगांवरचे संशोधन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हा रोग काही अंशी आटोक्‍यात आलेला आहे.

    तरीही भारतात दरवर्षी सुमारे 18 ते 20 लाख लोकांना क्षयाची लागण होते असे म्हणतात. माहीत नसलेल्या गोष्टीला गणितात क्ष किंवा य (क्षय) अशी संज्ञा देतो. परंतु या रोगाची आता पूर्ण माहिती झालेली आहे. त्याला क्ष-य म्हणण्याचे कारण उरलेले दिसत नाही. पूर्वीच्या काळी त्याला बरोबर उलटे म्हणजे यक्ष्मा किंवा राजयक्ष्मा का म्हणत असत हेही कळायला मार्ग नाही. “य’ धातूने वायुतत्त्वाचा बोध होतो फुप्फुसात वायूतत्त्वचा संचार कमी झाला की क्षय असे नाव पडले असावे.

    या रोगाला राजयक्ष्मा, क्षय, टी.बी. असे काहीही म्हटले तरी हा रोग जीवघेणा व दीर्घकाळ चालणारा खराच. हा रोग म्हणजे फुप्फुसांचा रोग असे सर्वसाधारण समजले जात असले तरी तो शरीरात इतर ठिकाणीही होऊ शकतो. याचा प्रादुर्भाव झाला असता बऱ्याच वेळा छोट्या गाठी येऊ शकतात, लहान आतड्यात, मूत्रपिंडाच्या ठिकाणी, हाडांच्या ठिकाणी, जननेंद्रियांच्या ठिकाणी हा रोग झालेला दिसतो. तो उग्र झाला तर एकाहून अधिक अवयवांना लागण होते व रोग्याकडून इतरांनाही संसर्ग झालेला दिसतो. हा आजार संसर्गजन्य आहे. झालेला रोग बरा करण्यासाठी, रोग साथीने पसरू नये व एकूणच प्रतकारशक्‍ती वाढवण्यासाठी धूमचिकित्सेचा खूप उपयोग होतो.

    सकाळ-संध्याकाळ घरात विशिष्ट द्रव्यांचा धूप (उदा. संतुलन प्युरिफायर धूप) नित्यनियमाने जाळण्याने रोगांचे जंतू पसरू नयेत म्हणून खूप उपयोग होतो. पूर्वी मोठ्या प्रमाणावर यज्ञ, याग वगैरेंद्वारे निर्जंतुकरण व निसर्ग संतुलन साधत असते.

    रात्री बरेच दिवस खोकला येत असला, खोकल्याची उबळ आल्यावर सारखे उठून बाहेर थुंकायला जावे लागत असले तर क्षयाची शंका घेतली जात असे. सारखे सारखे उठून बाहेर जायला लागू नये म्हणून ठेवलेली पिकदाणी व्यवस्थित बंद केली नाही, खोकताना अत्यंत काळजी घेतली नाही तर थुंकीवाटे उडालेले क्षयाचे जंतू वातावरणात तरंगत राहतात इतरांना क्षयाची लागण करू शकतात. ज्यांची प्रतकारशक्‍ती उत्तम आहे त्यांना क्षय होत नाही.

    शरीरात प्रतिकार करणाऱ्या पेशींचे सैन्य कधीही कमकुवत होता कामा नये हे क्षयरोगाच्या प्रतकारासाठी लक्षात ठेवणे खूप आवश्‍यक आहे. मधुमेहाचे रोगी, यकृताचे काम नीट न चालणाऱ्या व्यक्‍ती, एड्‌स असलेल्या व्यक्‍तीची प्रतकारशक्‍ती कमी होऊ शकत असल्याने त्यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते. तसेच कर्करोगी वा दीर्घकाळपर्यंत कॉर्टिझोनसारखे औषध घेतलेले रोगी यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते असे म्हणतात. गलिच्छ जागी राहणारे, झोपडपट्टीत राहणारे, फूटपाथवर राहणारे, तुरुंगासारख्या कमी जागेत खूप गर्दीत राहणारे या सर्वांना क्षयाची बाधा होण्याची शक्‍यता अधिक असते. तेव्हा अशा गोष्टी टाळणे आवश्‍यक असते.

    क्षयरोगाचा प्रथम मारा फुप्फुसांवर होत असल्याने अति धूम्रपान वा अति मद्यपान करून फुप्फुसे कमजोर झालेल्यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते. क्षयाचा इलाज करत असणारे परिचारक वा डॉक्‍टर्स यांनाही लागणीपासून बचावण्यासाठी काळजी घ्यावी लागते.
    थोडासा ताप व बरोबर खूप दिवस चाललेला खोकला, थुकींचे बेडके पडणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करून योग्य सल्ला न घेतल्यास त्रास होण्याची शक्‍यता असते. केवळ गरीब वा गलिच्छ वस्तीत राहणाऱ्यांनाच नव्हे तर अनेक श्रीमंत मंडळीही क्षयाला बळी पडल्याचा इतिहास आहे.

    मानसिक ताणामुळे शरीर खालावलेले असले व त्यावरचा मानवरचा अधिकार कमी झालेला असला तरीसुद्धा क्षयाची लागण होऊ शकते. राजयक्ष्मा असे याचे दुसरे नाव आहे म्हणजे हा रोग राजांना होतो असे नव्हे तर तो सर्व रोगांचा राजा असल्यासारखा असल्याने व त्यावर ताबडतोब इलाज करणे अपेक्षित असल्याने त्याला राजयक्ष्मा म्हटले गेले असावे.

    क्षयरोगाच्या तपासणीसाठी थुंकीच्या तपासणीबरोबर छातीचा एक्‍स रे काढणेही आवश्‍यक असते. भारतासारख्या ठिकाणी क्षयरोगाचा खूप प्रसार झालेला दिसतो. प्रत्येकाला लहानपणीच क्षयावरची लस टोचलेली असल्याने प्रतकारशक्‍ती असते पण क्षयाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यास ते कुठेतरी कमकुवत ठिकाणी दबा धरून राहतात व वेळप्रसंगी बाहेर येऊन व्यक्‍तीवर घाला घालतात. म्हणून जंतू शरीरात शिरल्याचे खूप दिवसांपर्यंत कळून येत नाही. त्यामुळे चांगल्या परिस्थितीतील सर्वसामान्यालाही हा रोग होऊ शकतो. तसेच क्षयरोगाचे जंतू अति हुशार असल्याने इलाज सुरू केल्यावर रोग बरा झाल्याची लक्षणे उत्पन्न होतात पण जंतू मात्र दुसरीकडे जाऊन लपून बसतात व वेळप्रसंगी डोके वर काढून रोग वाढवितात. खोकला झालेल्या प्रत्येकाला वा तसेच कफ बाहर पडलेल्या प्रत्येकाला क्षयरोग असतो असे नसते. पण बेडक्‍यात हलके हलके रक्‍त दिसायला लागले तर मात्र क्षयाची चिकित्सा करणे नक्की आवश्‍यक ठरते.

    क्षयरोगाच्या औषधांमुळे इतर त्रास झालेले दिसल्यास दिलेली औषधे बदलणे व एकूणच इलाजदपद्धती बदलणे आवश्‍यक असते. पचनाचा वा अंग दुखण्याचा त्रास दिसल्यास क्षयाचा संशय घेऊन त्यावरचा इलाज सुरू करण्यात येतो पण रुग्णाला आराम न वाटता औषधांचा दुष्परिणाम झालेला दिसतो. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ते उपचार करणे आवश्‍यक असते. तसेच क्षयरोग पूर्णपणे बरा झाल्याचे तपासणीत आढळत नाही तोपर्यंत नीट औषधोपचार व पथ्ये पाळणे आवश्‍यक असते.
    क्षयाच्या रोग्याला घरात ठेवूनच उपाययोजना करता येते परंतु त्याच्या थुकींची विल्हेवाट नीट लावणे आवश्‍यक असते. त्याने वापरलेले कपडे, आजूबाजूची जागा फिनेलसारखे द्रव्य वापरून निर्जंतुक करणे आवश्‍यक असते. सध्या क्षयावर मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन औषधे सापडलेली असली तरी मुळात क्षयाची लागण होऊ नये यासाठी काळजी घेणे अधिक महत्त्वाचे असते.
    क्षयाचा आजार होऊ नये असे वाटत असणाऱ्यांनी स्वच्छतेचा मंत्र पाळणे, प्रकृतीनुरूप योग्य प्रमाणात पौष्टिक व पूरक आहार घेऊन प्रतिकारशक्‍ती वाढवणे, आहारात दूध, फळे पालेभाज्या वगैरेंचा समावेश करणे, मैथुनात शरीरशक्‍तीचा अतिव्यय होणार नाही याकडे लक्ष ठेवणे, धूम्रपान, मद्यपान टाळणे आवश्‍यक असते.

    आयुर्वेदानुसार डिंकाचे लाडू, “संतुलन मॅरोसॅन’, “संतुलन शांतीरोझ” किंवा “संतुलन आत्मप्राश’सारखे रसायन सेवन करण्याने प्रतिकारशक्‍ती चांगली राहून क्षयरोगाचा यक्षप्रश्‍न सोडविता येईल.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • बद्धकोष्ठता

    बद्धकोष्ठता

    दिवसाची सुरवात मलविसर्जनाने नीट झाली, की दिवसही चांगला जातो. नाहीतर, दिवसभर कोणतं तरी ओझं वागवल्यागत वावरावं लागतं. मलविसर्जनाचं प्राकृतिक प्रमाण कायम राहणं हे स्वास्थ्याचं निदर्शक आहे. बद्धकोष्ठ म्हणजे मलविसर्जनात अडथळा असणं. म्हणजेच बद्धकोष्ठता हे अनारोग्याचं लक्षण होय. वायुदोषामुळे उद्‌भवणारे हे लक्षण म्हणजे आरोग्याच्या पुढच्या काळातील समस्यांची सूचनाच असते. बद्धकोष्ठामागील कारणांचा व त्यावरील उपाययोजनेचा आयुर्वेदानं सविस्तर विचार केला आहे.

    आयुर्वेदिक ग्रंथात मलावष्टंभ रोग म्हणून नाही, तर लक्षण म्हणून सांगितला आहे.
    मलग्रह, मलावरोध, मलस्तंभ, मलबंधन, मलनिग्रह, मलसंग, बद्धकोष्ठ अशा विविध शब्दात आपण आज ज्याला कॉन्स्टिपेशन म्हणतो त्या कष्टदायक प्रकाराचे वर्णन केले आहे.पुरीष, मूत्र आणि स्वेद हे शरीरातील तीन मुख्य मल. हे तीनही एका ठराविक काळानंतर शरीराबाहेर काढले जाणे अपेक्षित असते. त्यातील पुरीष व मूत्र उत्सर्जनाचे काम अपान वायूच्या हद्दीत येत असल्याने अपान वायूची ही जबाबदारी असते.जाठराग्नीकडून आहाराचे पचन झाले की सार भाग व टाकून द्यायचा भाग (विसर्जित होण्याचा भाग) असे विभाजन समानवायू करवी होत असते. यातील उपयुक्‍त सारभाग मुख्यत्वे छोट्या आतड्यात शोषला जातो. निःसार भाग जसजसा पुढे सरकतो तसतसा त्यातील द्रवभाग शोषला जातो आणि त्याच वेळेस पुरीष म्हणजेच मळ आकाराला येऊ लागतो. मल मोठया आतड्यातून पुढे मलाशयात पोचतो, तेथे साठतो व मलप्रवृत्तीची संवेदना होऊन मलविसर्जनाची क्रिया घडते.अशा प्रकारे मल तयार होण्यापासून विसर्जित करण्यापर्यंतची क्रिया बघितली तर एक गोष्ट लक्षात येते, की त्यात समान वायू व अपान वायू ह्या दोन वायूंचा संबंध आहे.मल कसा असावा व मलप्रवर्तन कशा प्रकारे व्हावे याचे आयुर्वेदात वर्णन केले ते असे – मलप्रवृत्ती सहज, दिवसातून एक किंवा दोन वेळा, नियमित वेळेला व्हावी, मल बांधून तरीही मऊ म्हणजे सोललेल्या केळ्यासारखा असावा. मलविसर्जनानंतर पोट साफ झाल्याची भावना व्हावी, अंग हलके व्हावे व उत्साह वाटावा.यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास तो समान-अपानाच्या कार्यात कुठेतरी अडथळा येत असल्याचा किंवा आहार-आचरणात काहीतरी बिघडत असल्याचा निर्देशक आहे असे समजावे. यालाच आयुर्वेदिक ग्रंथात मलावरोध, मलस्तंभ, मलनिग्रह वगैरे म्हटलेले आहे.

    मलावष्टंभ हे एक लक्षण म्हणून सांगितले असल्याने विविध रोगांशी किंवा बिघाडाशी संबंधित असू शकतो. त्यामुळे मलावष्टंभावर योग्य उपचार करायचा असेल तर मूळ कारण व त्यातून निर्माण झालेले असंतुलन बरे करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

    मलावष्टंभ का होतो?
    मलावष्टंभाची सर्वसाधारण कारणे याप्रकारे सांगता येतात –
    *    आहारात तिखट, कडू, तुरट रसांचा अतिरेक करणे.
    *    कोरडे म्हणजे ज्याच्यात उचित स्निग्धतेचा अभाव आहे व निःसत्त्व अन्न खाणे, उदा. तूप न लावता खाल्लेली भाकरी, पोळी; लोणी न लावलेला ब्रेड; चुरमुरे, चिवडा, पाणीपुरी सारख्या कोरड्या पदार्थांचा अतिरेक; शिळे अन्न
    *    शरीरास अनुकूल स्निग्ध पदार्थांचा अभाव. उदा. दूध, घरचे ताजे लोणी, साजूक तूप, आहारात तेल वगैरे स्निग्ध गोष्टी अजिबात न वापरणे किंवा अपुऱ्या प्रमाणात वापरणे.
    *    प्रकृतीला सहन होणार नाहीत असे उपवास करणे किंवा डाएटिंग करणे.
    *    वात वाढवणारी व पचायला जड असणारी कडधान्ये प्रकृतीचा विचार न करता खाणे, उदा. मटार, पावटा, चवळी, छोले, हरबरा वगैरे.
    *    आंबवलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाणे.
    *    भूक लागलेली नसताना जबरदस्तीने खाणे.
    *    अगोदरचे अन्न पचण्याअगोदरच पुन्हा पुन्हा खात राहाणे.
    *    रात्री जागरणे करणे, तसेच दिवसा झोपणे.
    *    व्यायामाचा अभाव किंवा अतिरेक करणे.
    *    अति मानसिक चिंता करणे.
    याखेरीज वयानुसार जसजसा वात वाढतो तसतशी आतड्यांची शक्‍ती कमी होत जाते व त्यांच्यात र?क्षता उत्पन्न होते. अशा वेळी बहुधा मलावष्टंभ हे लक्षण दिसते.

    तसेच मलप्रवर्तनाची संवेदना जाणवल्यावरही जर त्याकडे दुर्लक्ष केले, अर्थात वेग अडवून ठेवला, तर त्यामुळेही मलावष्टंभ होतो. अष्टांगसंग्रहात म्हटले आहे,
    आटोपशुलौ परिकर्तिका च संगः पुरीषस्य तथोर्ध्ववातः ।

    मलप्रवर्तनाच्या वेगाचे जबरदस्तीने धारण केले तर त्याने पोटात वायू पकडतो, पोट दुखू लागते, गुदाच्या भागी कात्रीने कापल्याप्रमाणे वेदना होतात, ढेकर येऊ लागतात व मलावष्टंभ होतो.

    अपानवायूचा अपराध
    अत्यंत अनैसर्गिक व अवघड वाटणारी ही गोष्ट आज समाजातील अनेक लोकांकडून होते आहे, वेळेची कमतरता, कामाचा ताण, सोयीचा अभाव अशा एक ना एक अनेक कारणांनी हा ‘अपराध” घडला की त्याची शिक्षा आज ना उद्या भोगावी लागतेच. याखेरीज “आनाह’ या नावाने सांगितलेल्या वातरोगाच्या वर्णनातही मलावष्टंभ हे प्रमुख लक्षण आहे.

    क्रमेण निचितमामं शकृत्‌ वा भूयो विगुणानिलेन विबद्धं सत्‌ यथामार्गं न प्रवर्तते स आनाहः ।
    …सुश्रुत उत्तरतन्त्र

    साचलेला आम (योग्य प्रकारे न पचलेला व शरीरात विषस्वरूप होऊन राहिलेला आहाररस) किंवा मल, वातदोष बिघडल्यामुळे घट्ट, कडक होतो व अपान वायूने मार्ग बंद केल्यामुळे गुदद्वारातून बाहेर जाऊ शकत नाही, बरोबरीने वातही न सरू शकल्याने पोट फुगते, धड ढेकर येत नाही, धड वायू सरत नाही आणि मलप्रवृत्तीही होत नाही. अशा अवघड अवस्थेला “आनाह” असे म्हणतात.
    अशाच प्रकारे इतर अनेक वातव्याधींमध्ये, विशेषतः समान व अपानवायू बिघडून होणाऱ्या वातव्याधींमध्ये मलावष्टंभ हे लक्षण दिले आहे.

    मलावष्टंभाचे दोन प्रकार
    1. केवळ वातामुळे होणारा मलावष्टंभ – यात मल कडक, सुकलेला, खड्यासारखा किंवा गाठीप्रमाणे घट्ट असतो. या प्रकारात मलप्रवर्तन होताना दुखते, कडक मळामुळे गुदभागी जखम होऊन रक्‍तही पडू शकते. अत्यंत तीव्र अवस्थेत अक्षरशः हाताने मळ काढून टाकावा लागतो किंवा एनिमा दिल्याशिवाय मलप्रवर्तन होत नाही.

    2. आमाच्या आणि कफाचा संबंध असलेला मलावष्टंभ – यात मल चिकट, चिखलासारखा असतो. या प्रकारात फार वेळ कुंथावे लागते. एकाच वेळेस पोट साफ झाले अशी भावना कधीच वाटत नाही. कैक वेळा चिकट्याच्या स्वरूपात प्राकृत कफ शरीराबाहेर जाऊ लागल्यास मलप्रवृत्तीनंतर थकवा येतो. काही व्यक्‍तींना तर नंतर झोपावेच लागते.

    मलावष्टंभ फार दिवस राहिल्यास त्याचा परिणाम म्हणून बाकीही समस्या उद्‌भवू शकतात. उदा. डोके दुखणे, मूळव्याध, फिशर-फिश्‍च्युला, हर्निया, निद्रानाश, निरुत्साह, आळस, सर्वांग जड होणे, अंग दुखणे वगैरे.

    म्हणूनच मलावष्टंभावर वेळीच व योग्य उपचार करावेत. केवळ पोट साफ होण्यासाठी औषध घेणे किंवा पोट साफ व्हावे म्हणून सकाळी तीन – चार लिटर पाणी पिणे म्हणजे मलावष्टंभावर उपचार केला, या भ्रमात न राहणेच चांगले होय. कारण अशा उपचारांनी मूळ मलावष्टंभात भर पडत असते व दिवसेंदिवस मलावष्टंभाची तीव्रता वाढत जाऊन असहाय अवस्थेला आमंत्रणच मिळत असते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोट साफ होणे हे वाताचे कार्य आहे हे आपण जाणतोच. तर मलप्रवर्तनाचे कार्य वाताच्या काळात जेवढे चांगले व पूर्णतः होईल तेवढे इतर वेळी होणार नाही हे नक्की. वाताचा काळ म्हणजे रात्रीचा अंतिम भाग व भल्या पहाटेचा सूर्योदयाच्या आसपासची वेळ. सकाळी सहा – साडेसहा पर्यंत उठून शौचाला जाण्याची सवय शरीराला लावली तर आपोआपच वाताच्या वेळात वाताचे कार्य होऊन जाईल. यामुळे मलाष्टंभाचा त्रास उद्‌भवणारच नाही. मलाष्टंभाचा त्रास असणाऱ्यांनीही ही सवय लावून घ्यावी आज ना उद्या त्याचा निश्‍चित फायदा होईल.

    बद्धकोष्ठावरील उपाय*    मलावष्टंभाची आपल्या आरोग्याच्या बाबतीतील कारणे शोधून काढून त्यानुसार आहार-आचरणात योग्य बदल करावेत.
    *    उकळलेले गरम पाणी पिणे हे कोणत्याही प्रकारच्या मलावष्टंभात एक उत्तम सहायक उपाय आहे.
    *    घरी बनवलेले साजूक तूप हेही यासाठी एक वरदानच होय. कारण ते अग्नीची ताकद वाढवते, समान वायूला संतुलित करून त्याची शक्‍ती वाढवते व अपान वायूला अनुलोमनाची गती देते त्यामुळे आहारात तर साजूक तुपाचा समावेश करावाच शिवाय रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप व दोन चिमूट सैंधव मीठ टाकून प्यावे.
    *    वातप्रधान मलावष्टंभ असल्यास स्निग्ध द्रव्यांचा वापर करावा उदा. एरंडेल तेल, बहावा, मनुका, निशोत्तर वगैरे.
    *    सौम्य मलावष्टंभ असल्यास अविपत्तिकर चूर्ण, भिजवलेल्या मनुका, अंजीर वगैरे गोष्टी कामास येतात. तर तीव्र मलावष्टंभ असल्यास गंधर्वहरीतकी, सुखसारक चूर्ण वगैरे औषधांची मदत घ्यावी लागते.
    *    वातशामक औषधांनी सिद्ध तेलाचा बस्ती (आयुर्वेदिक एनिमा) हाही एक प्रभावी उपचार आहे.
    *    आम व कफाचा संबंध असणाऱ्या मलावष्टंभात आमपचनापासून सुरुवात करावी लागते त्यासाठी हिंग्वाष्टक चूर्ण, शंखवटी, आमपाचक वटीचा वापर केला जातो.तसेच आतील चिकटा काढून टाकण्यासाठी पिच्छिल म्हणजे बुळबुळीत द्रव्यांची मदत घेतली जाते. उदा. इसबगोल, अहळीव वगैरे. बरोबरीने त्रिफळा, हिरडा, सोनामुखी वगैरे मलप्रवर्तन करणाऱ्या वनस्पतीही वापरल्या जातात.
    *    पोटावर हलक्‍या हाताने तेल चोळल्यास वात सरून पोट साफ होण्यास मदत होते. वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेल असल्यास उत्तमच अथवा एरंडेलही चालू शकते.

    – डॉ. श्री बालाजी तांबे

  • डोकेदुखी

    डोकेदुखी

    डोके दुखणे माहीत नाही, अशी व्यक्‍ती सापडणे अवघडच असावे. वेदना वा दुखणे नकोसे वाटणे अगदी साहजिक असते; पण डोकेदुखी खरोखर खूप त्रासदायक असते.
    आयुर्वेदात डोक्‍याला उत्तमांग म्हटले आहे; कारण डोके हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा मेंदू डोक्‍यात असतो, सर्व संप्रेरकांना चालना देणारी पिच्युटरी ग्रंथी डोक्‍यात असते, कान-नाक-डोळे वगैरे इंद्रियांचे अधिष्ठानही डोक्‍यात असते. मेंदूची जास्तीत जास्ती काळजी घ्यायला हवी, यात कोणत्याही शास्त्राचे दुमत नसावे. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. डोकेदुखीची तीव्रता, कालावधीसुद्धा व्यक्‍तीनुरूप व कालानुरूप बदलू शकते. म्हणूनच डोकेदुखीवर उपचार करताना अनेक मुद्‌द्‌यांवर विचार करावा लागतो. मुख्य म्हणजे अचूक निदान करणे खूपच गरजेचे असते.डोकेदुखीची कारणे आयुर्वेदात याप्रमाणे दिलेली आहेत-
    * मल, मूत्र, शिंक वगैरे नैसर्गिक प्रवृत्तींना अडवून ठेवणे.
    * दिवसा झोपणे.
    * रात्री जागरण करणे.
    * अति मद्यपान किंवा अंमल चढणाऱ्या वस्तूंच्या आहारी जाणे.
    * डोक्‍यावर जोराचा वारा लागणे.
    * अति मैथुन करणे.
    * न आवडणारा वास घेणे.
    * धूळ, धूर, अतिशय थंडी किंवा उन्हाच्या संपर्कात येणे.
    * पचण्यास जड, आंबट, गोष्टींचे तसेच पुदिना, मिरची वगैरे हरितवर्गातील गोष्टींचे अतिसेवन.
    * अतिशय थंड पाणी पिणे.
    * डोक्‍याला मार लागणे.
    * अश्रूंना अडवून ठेवणे किंवा खूप रडणे.
    * शरीरात आमदोष वाढणे.
    * आकाशात मेघ दाटून येणे.
    * अतिशय मानसिक कष्ट होणे.
    * जनपदोध्वंसातील देश आणि काळ बिघडणे.
    यातील एक किंवा अनेक कारणांनी वातादी दोष असंतुलित होतात आणि डोक्‍यात जाऊन तेथील रक्तधातूला दूषित करतात. यातून अनेक प्रकारचे शिरोरोग उत्पन्न होतात. या शिरोरोगांचे मुख्य लक्षण असते शिरःशूळ अर्थात डोकेदुखी.
    शिरःशूळाचे एकूण 11 प्रकार सांगितलेले आहेत.
    1. वातदोषा : यामुळे होणाऱ्या डोकेदुखीमध्ये एकाएकी, क्षुल्लक कारणानेसुद्धा डोके खूप दुखू लागते. डोकेदुखी रात्री अधिक वाढते. डोक्‍यावर गरम वस्त्र आवळून बांधल्याने, तसेच डोक्‍याला शेक करण्याने या प्रकारचे दुखणे कमी होते.

    2. पित्तदोष: यामुळे डोके दुखते तेव्हा डोके व डोळ्यांची आग होते, श्‍वास गरम भासतो, दिवसा वेदना वाढतात तसेच गरम गोष्टी नकोशा वाटतात. डोक्‍याला थंड स्पर्शाने बरे वाटते. रात्री वेदना कमी होतात.

    3. कफदोष : यामुळे डोके दुखते तेव्हा बरोबरीने डोके जड, जखडल्यासारखे वाटते; चेहऱ्यावर, डोळ्यांखाली सूज दुपारनंतर सूर्य खाली जातो तसतशा वेदना कमी होत जातात आणि सूर्यास्तानंतर थांबतात.

    4. अनन्तवात : वातादी तिन्ही दोष प्रकोपित होऊन मानेत तीव्र वेदना करतात. ही वेदना भुवया, डोळे व शंखप्रदेशापर्यंत पोचते, मान जखडू शकते, हनुवटी जखडू शकते. अनंतवातामुळे विविध प्रकारचे नेत्ररोगसुद्धा होऊ शकतात.

    5. अर्धावभेदक : याला सामान्य भाषेत अर्धशिशी असे म्हणतात. यात डोक्‍याच्या डाव्या वा उजव्या बाजूला अतिशय तीव्र वेदना होतात. या वेदना इतक्‍या तीव्र असतात, की जणू डोक्‍यात शस्त्राने प्रहार होत आहेत असे वाटते किंवा ऐरणीतून आग निघत असल्यासारखे वाटते. अर्धावभेदक खूप तीव्र झाला, तर त्याचा कान किंवा डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

    6. शंखक : रक्‍त, पित्त व वात हे तिन्ही प्रकोपित झाल्याने ही डोकेदुखी होते. ती इतकी भयंकर असते, की तीन दिवसांच्या आत योग्य उपचार न मिळाल्यास व्यक्‍ती मृत्युमुखी पडू शकते. डोकेदुखीवर उपचार करण्यापूर्वी नेमके कारण शोधून काढणे सर्वांत महत्त्वाचे असते. बहुतांशी वेळेला डोके दुखायला लागले, की केवळ वेदनाशामक उपचार करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे तात्पुरते बरे वाटले, तरी पुन्हा पुन्हा डोके दुखू शकते.

    7. वात : वातामुळे डोके दुखत असल्यास कानात तेल टाकता येते, नाकात तूप घालता येते, डोक्‍याला वातशामक तेल लावण्याचाही उपयोग होतो.

    8. पित्त : पित्तामुळे डोके दुखत असल्यास दुधात भिजविलेली आवळकाठी बारीक करून त्याचा डोक्‍यावर लेप लावल्यास बरे वाटते. दुधात तूप-साखर व थोडे केशर घालून पिण्याचाही फायदा होतो. ऊन लागून पित्त वाढत असल्यास कोकमाचे तेल व नारळाचे तेल गरम करून एकत्र करून थंड झाले, की डोक्‍याला लावण्याने बरे वाटते. गुलाबपाण्यात चंदन उगाळून त्याचा डोक्‍यावर लेप लावण्यानेही बरे वाटते.

    9. कफ : कफामुळे डोके दुखत असल्यास आल्याच्या रसात थोडीशी पिंपळी उगाळून त्यात थोडे सैंधव व गूळ मिसळून सेवन करण्याने बरे वाटते. सर्दीमुळे डोके दुखत असल्यास दुधात किंवा पाण्यात दालचिनी उगाळून लेप लावल्यास बरे वाटते. निर्गुडी, कडुनिंब, आघाडा यांचा पाला पाण्यात घालून त्याचा वाफारा घेतल्यानेही कफदोषाशी संबंधित डोकेदुखी दूर व्हायला मदत मिळते.

    10. रक्त : रक्तातील दोषामुळे डोके दुखते, त्यावर पित्तशामक उपचार करण्याचा उपयोग होतो. शतधौत तूप (म्हणजे 100 वेळा थंड पाण्याने धुतलेले तूप) डोक्‍यावर चोळण्याचा फायदा होतो. शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन आणि रक्तमोक्षण करून घेण्याचाही फायदा होतो.

    वारंवार डोके दुखण्याची सवय असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा काही गोष्टी: 

    1. आठवड्यातून किमान दोन वेळा पादाभ्यंग करणे.
    2. रात्री झोपताना नाकात साजूक तूप किवा अधिक गुण यावा म्हणून नस्यसॅन घृतासारखे औषधी तूप घालणे.
    3. संगणकावर काम करणाऱ्यांनी डोळ्यांत सॅन अंजनासारखे उष्णता कमी करण्यास मदत करणारे अंजन घालणे.
    4. स्त्रियांनी स्त्री संतुलनाकडे, विशेषतः पाळी नियमित आणि व्यवस्थित येण्याकडे लक्ष ठेवणे.
    5. उन्हात किंवा वाऱ्यात जावे लागल्यास डोक्‍याला पुरेसे संरक्षण द्यावे.
    6. डोक्‍याला नियमित, कमीत कमी दोन वेळा तरी वातशामक व केसांना हितकर औषधी द्रव्यांनी संस्कारित तेल लावणे.
    7. रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे.

    – डॉ. श्री बालाजी तांबे

  • रजोनिवृत्ती

    रजोनिवृत्ती

    “रज’ हा रसधातूचा उपधातू असल्याने स्त्रीचा रसधातू व मासिक पाळी यांचा खूप जवळचा संबंध असतो. रसधातू जितका चांगला, जितका संपन्न, तितकी मासिक पाळी व्यवस्थित व नियमित असते. मात्र वयानुरूप शरीरात वात वाढायला लागला, की त्यामुळे रसधातूची संपन्नता कमी कमी होत जाते आणि त्यातूनच रजोनिवृत्तीची सुरवात होते. आयुर्वेदानुसार पन्नाशीनंतर रजोनिवृत्ती येणे अपेक्षित असते; पण सध्याच्या जीवनपद्धतीत पाळीच्या दिवसात बरेचसे नियम पाळणे शक्‍य होत नाही. तसेच प्रकृतीनुसार आहार-विहार होत नाही आणि म्हणून रजोनिवृत्तीचे वय बरेच अलीकडे आलेले दिसते. पण सुरवातीपासूनच पुरेशी काळजी घेतली, तर स्त्री-आरोग्याची पातळी लक्षणीयरीत्या उंचावेल, यात काही शंका नाही.”

    वातादी त्रिदोष, रसरक्‍तादी सप्तधातू आणि मलमूत्रस्वेद त्रिमल हे स्त्री व पुरुष दोघांतही असतात. पण तरीही स्त्री पुरुषापेक्षा शारीरिक दृष्ट्या, तसेच स्रोतसांच्या कार्याचा विचार करता खूप वेगळी असते. हे वेगळेपण स्त्रीच्या रजःप्रवृत्तीमुळे सिद्ध होते, स्त्रीतील गर्भधारणक्षमतेतून सिद्ध होते.

    पाळी सुरू होणे म्हणजेच रजःप्रवृत्तीचा आरंभ आणि उतारवयात कायमची पाळी थांबणे म्हणजे रजोनिवृत्ती. हे दोन स्त्रीच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे होत. मुळात “रज’ हा रसधातूचा उपधातू असतो, रसधातू हा संपूर्ण शरीराचे प्रसादन करणारा असतो, सर्व शरीरावयवांना तृप्त करण्याची जबाबदारी रसधातूवर असते आणि अशा रसधातूचा उपधातू असणाऱ्या रजावर गर्भधारणा झाली, तर गर्भाचे पोषण करण्याची जबाबदारी असते. मात्र गर्भधारणा झाली नाही तर हे रज “मल’ म्हणून शरीराबाहेर टाकले जाते. आयुर्वेदात या संबंधात खालीलप्रमाणे सांगितले आहे,

    सि मासि रजः स्त्रीणां रसजं स्रवति त्र्यहम्‌ ।वत्सराद्‌ द्वादशात्‌ ऊर्ध्वं याति पञ्चाशतः क्षयम्‌ ।।
    ..अष्टांग हृदय शारीरस्थान

    रसधातूची संपन्नता
    प्रत्येक महिन्याला रसधातूपासून तयार होणारे रज स्त्रीशरीरातून तीन दिवसांपर्यंत स्रवत असते. ही क्रिया साधारण बाराव्या वर्षांपासून सुरू होते व पन्नाशीनंतर थांबते. फक्‍त गर्भधारणा झाली, की या चक्रामध्ये खंड पडतो. “रज’ हा रसधातूचा उपधातू असल्याने स्त्रीचा रसधातू व मासिक पाळी यांचा खूप जवळचा संबंध असतो. रसधातू जितका चांगला, जितका संपन्न, तितकी मासिक पाळी व्यवस्थित व नियमित असते. मात्र वयानुरूप शरीरात वात वाढायला लागला, की त्यामुळे रसधातूची संपन्नता कमी कमी होत जाते आणि त्यातूनच रजोनिवृत्तीची सुरवात होते.

    तद्‌ वर्षात्‌ द्वादशात्‌ काले वर्तमानमसृक्‌ पुनः । जरा पक्वशरीराणां याति पञ्चाशतः क्षयम्‌ ।।…सुश्रुत शारीरस्थान
    रज स्त्रीच्या शरीरात बाराव्या वर्षांनंतर उत्पन्न होते आणि वृद्धपणामुळे शरीरधातू जीर्ण झाले की पन्नास वर्षांनंतर क्षय पावते.
    यावरून वयानुसार रजोनिवृत्ती येणे स्वाभाविक असते हे समजते. वयानुरूप रसधातूची संपन्नता कमी होणेही स्वाभाविक असते; पण जर रसधातू प्रमाणापेक्षा कमी झाला, रसक्षय म्हणता येईल इतक्‍या अवस्थेपर्यंत पोचला, तर रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. आयुर्वेदाने रसक्षयाची म्हणूून सांगितलेली लक्षणे रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवू शकतात.
    रसे रौक्ष्यं श्रमः शोषो ग्लानि शब्दासहिष्णुता ।
    …अष्टांगहृदय सूत्रस्थान

    रसक्षयाने होणारे त्रास
    * शरीरात कोरडेपणा वाढतो म्हणजे त्वचा, केस, डोळे, योनी वगैरे ठिकाणी कोरडेपणा जाणवू लागतो.
    * फारसे श्रम झाले नाहीत तरी खूप थकवा जाणवतो.
    * मुख, घसा, जिभेला शोष पडतो.
    * शरीराला ग्लानी येते, उत्साह वाटत नाही.
    * आवाज सहन होईनासा होतो..
    * अकारण धडधड होते.
    * मन अस्वस्थ होते, शून्यता अनुभूत होते.
    याखेरीज एकाएकी वजन वाढणे किंवा कमी होणे हेही रसधातूशी संबंधित असल्याने रजोनिवृत्तीच्या दरम्यान वजन वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. तसेच मासिक पाळीमध्ये एकाएकी बदल होणे, उदा. दोन मासिक पाळींतील अंतर कमी होणे वा वाढणे, रक्‍तस्राव अतिप्रमाणात होणे किंवा बरेच दिवस होत राहणे, पाण्यासारखा वा पांढरा स्राव होणे यांसारखी लक्षणेही रजोनिवृत्तीच्या काळात निर्माण होऊ शकतात. एकाएकी गरम होणे (हॉट फ्लशेस), घाम फुटणे असाही त्रास काही स्त्रियांमध्ये होताना दिसतो.

      निवृत्ती म्हटली की कसेसेच व्हायला लागते. निवृत्त होताना जणू काही आता जीवनात काही उरले नाही, अशा तऱ्हेने माणसे वागायला लागतात. खरे पाहताना निवृत्ती कामाच्या बदलाची असते. निवृत्ती ही नवीन क्षेत्र समोर उघडण्यासाठी संधी देत असते. अनेक वर्षे जे काही केले त्या कामाने आलेला कंटाळा झटकून टाकून काहीतरी नवीन कार्य करण्याची निवृत्ती ही सुरवात असू शकते. तसे पाहताना निवृत्तीपूर्वीची काही वर्षे थोडे थोडे काम कमी करून इतर कार्यक्षेत्रात भाग घेतल्यास निवृत्तीची भीती वाटत नाही व निवृत्तीमुळे शरीर-मनावर काही विपरीत परिणाम होत नाहीत.

    रजोनिवृत्तीच्या बाबतीतही असाच विचार करायला हरकत नसावी. रजोनिवृत्ती जरी फक्‍त स्त्रियांपुरती मर्यादित असली, तरीसुद्धा स्त्री-पुरुषही एक जोडी असल्यामुळे स्त्रीच्या निवृत्तीचा काही परिणाम पुरुषावर होतोच. “रज’ हा शब्द रसरक्‍तासाठी वापरलेला आहे. ज्या प्रक्रियेद्वारा जन्म घेता येतो, त्याच्याशी संबंधित असलेला हा रसधातूचा उपधातू. स्त्रीच्या अंडाशयातून प्रत्येक महिन्याला जन्म देण्याची शक्‍यता असलेले एक बीजांड बाहेर पडते, हे बीज फलित न झाल्यास गर्भाशयातून बाहेर पडणारे रज (र+ज) ही साधी समजूत करून घ्यायला हरकत नाही. रजःप्रवृत्ती साधारणपणे मुलगी वयात आली की म्हणजे साधारण बाराव्या- तेराव्या वर्षापासून सुरू होते व ती प्रत्येक महिन्याला होत असल्याने त्याला मासिक धर्म असेही म्हटले जाते. बाराव्या-तेराव्या वर्षी सुरू झालेली व प्रत्येक महिन्याला तीन-चार दिवस चालणारी ही क्रिया अनेक वर्षे नित्यनियमाने सुरू असते. त्यामुळे स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध होते. या सर्व प्रक्रियेचे आरोग्य बरोबर असले तर संततीला जन्म देण्याची शक्‍यता म्हणजेच स्त्रीला मातृत्व प्राप्त होण्याची शक्‍यता वा योग्यता दिसून येते आणि मातृत्व प्राप्त झाल्यावर स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध झाल्याने ती भाग्यवान ठरते.

      कामधंद्यातून निवृत्त व्हायची वेळ न येता आधीच निवृत्ती घेतल्यानंतर एखादा व्यवसाय चांगला जमल्यास ठीक, अन्यथा निवृत्तीनंतर मिळालेले पैसे संपल्यावर त्रास होतो, तसा वेळेच्या अगोदर रजोनिवृत्ती आणण्याचा

    प्रयत्न केल्यासही बऱ्याच प्रकारचा त्रास होऊ शकतो. खरे पाहताना स्त्रीचे रजःप्रवृत्ती चालू असेपर्यंत पुरुष व स्त्री हा भेद दिसतो.
    एकदा रजोनिवृत्ती झाली, की स्त्रीच्या शरीरात पुरुष हार्मोन्सचे प्रमाण वाढायला लागते. परिणामतः स्त्रीच्या शरीरात पुरुषासारखे काही बदल दिसायला लागतात. स्त्रीचे सौंदर्य, स्त्रीचा स्वभाव, स्त्रीची विशेषता स्त्रीत्वात असते. या स्त्रीत्वाचीच निवृत्ती केली, तर स्त्रीचा मूळ धर्म टाकून केलेली वागणूक नैसर्गिक राहणार नाही, अशी शक्‍यता तयार होते. रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे बदल त्रासदायक ठरू नयेत म्हणून केलेल्या औषधोपचार योजनेमुळे इतर त्रास होणार नाहीत, याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते आणि म्हणून नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाययोजना श्रेयस्कर ठरतात. बऱ्याच स्त्रियांची नैसर्गिकपणेच रजोनिवृत्ती लवकर होते, पण अशा वेळीही स्त्रियांच्या स्वभावात बदल झालेले दिसतात. काही वेळा स्त्रीला काही विशेष रोग झाला असता रजोनिवृत्ती लवकर येताना दिसते. रजःस्रावामुळे स्त्रीचे शरीर शुद्ध राहते, सौंदर्य टिकून राहते, त्वचा सुंदर राहते, आवाज गोड व मधुर राहतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीला या गोष्टींना मुकावे लागू शकते व बाह्यउपचारांनी हे गुण कसेबसे टिकवावे लागतात. त्यामुळे जेवढी रजोनिवृत्ती लांबेल तेवढे स्त्रीत्व व तारुण्य जास्त काळ टिकून राहू शकते.रजोनिवृत्तीच्या वेळी प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या शरीरात असलेली हाडे व्यवस्थित राहावी, संपूर्ण शरीराचे संतुलन राहावे, शरीरातील कॅल्शियम, लोह नीट टिकावे म्हणून विशेष आयुर्वेदिक उत्पादने घेण्याची आवश्‍यकता असते. तसेच एरवी दूध आवडत नसले तरी रजोनिवृत्तीच्या काळात दूध घेणे अत्यावश्‍यक असते. ज्या स्त्रियांना रजःप्रवृत्ती होते त्या प्रत्येक स्त्रीने रक्‍त वाढण्यासाठी रक्‍तवर्धक योग व अन्न लक्ष ठेवून घेणे श्रेयस्कर ठरते. असे असताना रजोनिवृत्तीच्या वेळी तर या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःचे संतुलन ठेवणे खूप आवश्‍यक असते. तसेच रजोनिवृत्तीच्या वेळी गुप्तांगावर कोरडेपणा येणार नाही याची काळजी घेणेही खूप आवश्‍यक असते. रजोनिवृत्तीच्या वेळी केस गळणे, स्वभाव चिडचिडा होणे या गोष्टी टाळायच्या असतील तर आधीपासून काळजी घेऊन आयुर्वेदाने सांगितलेले उपचार करून घेणे आवश्‍यक असते. अशोकारिष्ट, कुमारी आसव, शतावरी कल्प, प्रवाळपंचामृत, कामदुधा, मौक्‍तिक वगैरे सर्व योग किंवा हे योग वापरून तयार केलेली विशेष औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आवश्‍यक असते. मासिक धर्म चालू असताना नैसर्गिक नियम पाळले तर अकाली रजोनिवृत्ती येणार नाही. तसे पाहता पुरुष कामेच्छेपासून कधीच निवृत्त होत नाहीत, परंतु रजोनिवृत्तीनंतर स्त्रीची कामेच्छा कमी होऊ शकते. अशा वेळी कौटुंबिक संबंधात अडचणी आलेली उदाहरणे दिसतात.

    शारीरिक बदल
    रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात होणारे बदल आयुर्वेदिक दृष्ट्या याप्रमाणे सांगता येतात.
    1. पित्तावस्था संपून वातावस्थेला प्रारंभ होतो.
    2. रसधातूची संपन्नता कमी होते.
    3. स्त्रीविशिष्ट अवयवांची कार्यक्षमता क्रमाक्रमाने कमी होऊ लागते.
    4. पित्त व वात या दोन्ही दोषांमध्ये बदल होत असल्याने त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या अग्नीमध्येही बदल होतात.
    5. वात वाढल्याने व अग्नीत बदल झाल्याने हाडांची दृढता कमी होऊ लागते.
    अर्थात हे सर्व बदल स्वाभाविक असले व त्यामुळे शरीर-मनावर थोडाफार परिणाम होणे नैसर्गिक असले, तरी त्यामुळे त्रास होतोच असे नाही. होत असलेल्या बदलांना जर शारीरिक दृष्ट्या मदत मिळू शकली आणि मानसिकरीत्या स्वीकारण्याची तयारी ठेवली तरी रजोनिवृत्तीतील त्रासांपासून दूर राहता येणे अवघड नाही.

    सहजसाध्य उपाय
    रजोनिवृत्तीचा त्रास व्हायला नको असेल तर मुळात रसधातूची सुरवातीपासून काळजी घ्यायला हवी. तरुण वयातच रसधातू अशक्‍त असला तर वयानुरूप संपन्नता कमी होण्याच्या काळात म्हणजेच रजोनिवृत्तीच्या काळात रसक्षय होतो आणि मग रजोनिवृत्ती त्रासदायक ठरू शकते. रसधातूची काळजी घेण्याबरोबरच वय वाढले तरी त्यामुळे वाढणारा वात शक्‍य तेवढा संतुलित राहील याकडे लक्ष ठेवायला हवे. स्त्रीविशिष्ट अवयव सुरवातीपासूनच व्यवस्थित कार्यक्षम राहण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. हे सर्व साध्य होण्यासाठी साधे व सहज करता येण्यासारखे उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतात, सुरवातीपासून पाळी व्यवस्थित येण्याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. कारण यामुळे रसधातू व्यवस्थित काम करतो आहे हे समजू शकते.

    * आहारात रसपोषक पदार्थांचा उदा. साळीच्या लाह्या, दूध, प्रकृतीनुरूप फळांचे रस वगैरेंचा समावेश करणे.
    * नियमित अभ्यंग करणे. आहारासह साजूक तूप पुरेशा प्रमाणात सेवन करणे. यामुळे शरीरातील अग्नीही संतुलित राहू शकतो, वातही नियंत्रित राहतो. हाडे मजबूत राहण्यासाठी दूध, डिंकाचे लाडू, खारीक, खसखस यांचे नियमित सेवन करणे.
    स्त्रीविशिष्ट अवयवांची काळजी घेण्याच्या दृष्टीने योनिपिचू, योनिधूप, अधूनमधून कुमारी आसव, अशोकारिष्ट वगैरे औषधांचे सेवन करणे.
    * रसधातू, शुक्रधातू तसेच एकंदरच स्त्रीप्रजननसंस्था निरोगी व कार्यक्षम राहण्यासाठी शतावरी कल्प, धात्री रसायन, “सॅन रोझ’सारख्या रसायनांचे सेवन करणे.
    * वाताचे, अग्नीचे संतुलन होण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने व प्राणायाम करणे, सर्वसामान्यांना दैनंदिन आचरणासाठी व आरोग्यावर लक्ष ठेवून विकसित केलेल्या संतुलन क्रिया योगपैकी “संतुलन फुलपाखरू’ क्रिया, समर्पण, सूर्यनमस्कार या क्रिया सुचविता येतील.
    * रस, अग्नी हे शरीरातील अतिशय संवेदनशील घटक असल्याने त्यांच्यावर मानसिकतेचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो. दुःख झाले की भूक लागत नाही किंवा खूप मानसिक ताण आला तर चेहरा काळवंडतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात, याचा प्रत्यक्षात अनेकदा प्रत्यय येत असतो. आयुर्वेदात अतिचिंता हे रसक्षयाचे एक मुख्य कारण सांगितले आहे. म्हणूनच मनाची प्रसन्नतासुद्धा रसधातू संपन्न ठेवण्यासाठी, अग्नीला संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाची असते. त्यासाठी “स्त्री संतुलन’संगीत ऐकणे, योगासने व अनुलोम-विलोमसारखा प्राणायाम यांचाही रोजच्या दिनक्रमात समावेश करणे उत्तम ठरते.

    या सर्वांमुळे स्त्री आरोग्य उत्तम राहायला मदत मिळते. शिवाय रजोनिवृत्तीच्या काळातही फारसा त्रास होऊ नये यासाठी पूर्वतयारी होत असते.
    रजोनिवृत्तीला कधी सुरवात होईल, रजोनिवृत्तीची लक्षणे सुरू झाल्यावर संपूर्णपणे रजोनिवृत्ती कधी येईल असे प्रश्‍न पडणे स्वाभाविक असले, तरी यांची उत्तरे प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळी असू शकतात. सुरवातीला पाहिल्याप्रमाणे आयुर्वेदानुसार पन्नाशीनंतर रजोनिवृत्ती येणे अपेक्षित असते. सध्याच्या जीवनपद्धतीत पाळीच्या दिवसात बरेचसे नियम पाळणे शक्‍य होत नाही. तसेच प्रकृतीनुसार आहार-विहार होत नाही आणि म्हणून रजोनिवृत्तीचे वय बरेच अलीकडे आलेले दिसते. पण फार लवकर रजोनिवृत्ती होणे स्त्रीच्या आरोग्यास, तारुण्यास, सौंदर्यास बाधक ठरू शकते. वयाच्या पस्तीशी-छत्तीशीलाच रजोनिवृत्तीची लक्षणे दिसायला लागली तर तो विकार समजायला हवा व दूर करण्यासाठी प्रयत्नही करायला हवेत, हे नक्की.

    थोडक्‍यात सांगायचे, तर रजोनिवृत्ती स्त्रीच्या आयुष्यातली स्वाभाविक घटना असली, तरी ती योग्य वेळेलाच यावी व त्या दरम्यान स्त्रीला त्रास होऊ नये याकडे लक्ष ठेवायला हव. सुरवातीपासून काळजी घेतली तर रजोनिवृत्तीस कधी सुरवात झाली व रजोनिवृत्ती कधी आली, हे समजतही नाही, अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. अधिकाधिक स्त्रियांनी याचा अनुभव घेतला तर एकंदरच स्त्री-आरोग्याची पातळी लक्षणीयरीत्या उंचावेल, यात काही शंका नाही.

    ऐन रजोनिवृत्तीच्या काळात आवर्जून कराव्यात अशा काही गोष्टी :
    * आहारात दूध, खारीक, साजूक तूप यांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे.
    * अंगाला अभ्यंग करणे, योनीत औषधी तेलाचा पिचू ठेवणे.
    शतावरी कल्प, “सॅन रोझ’, “मॅरोसॅन’सारखे रसायन सेवन करणे.
    * रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागली की तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली 3-4 उत्तरबस्ती करून घेणे.
    * पाळीच्या संबंधात काही त्रासदायक बदल होत असल्यास बिघाड संतुलित करू शकणारे उपाय योजणे.
    * सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रजोनिवृत्ती शरीरातील एक स्वाभाविक बदल आहे याचा मानसिकदृष्ट्या स्वीकार करणे.

    – डॉ. श्री बालाजी तांबे

  • शाकाहार

    शाकाहार

    डॉ. श्री बालाजी तांबे

    अन्नाचे मुख्य कार्य शरीर, बल, प्राणशक्‍ती व मनोधारणा तयार करणे हेच आहे. तेव्हा आपल्या शरीराला जे मानवेल, म्हणजेच नैसर्गिकरीत्या पचून बल देईल, असे अन्न प्रत्येकाने खावे. केवळ शाकाहारच षड्ररसपूर्ण व चार प्रकारचे अन्न पुरवू शकतो.

    शा काहार व मांसाहार असे आहाराचे दोन प्रकारात वर्गीकरण होते. आयुर्वेदात भाज्या, फळे वगैरे शाकाहारी द्रव्यांचे गुणधर्म सांगितले आहेत, त्याचप्रमाणे विविध पक्षी-प्राण्यांच्या मांसाचे गुणधर्मही वर्णन केले आहेत. मात्र आयुर्वेदातील “अन्नयोग’ संकल्पना अंमलात आणायची ठरविले, औषधे बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकद्रव्यांचा आढावा घेतला तर मांसाहारापेक्षा शाकाहारालाच अधिक महत्त्व दिलेले आढळते.

    “चतुर्विध आहार’ ही संकल्पना आयुर्वेदात तसेच इतरही भारतीय शास्त्रांमध्येही आहे. पेय म्हणजे पिण्यास योग्य पदार्थ, लेह्य म्हणजे चाटून खाण्याजोगे पदार्थ, भोज्य म्हणजे सहज खाता येतील असे पदार्थ आणि भक्ष्य म्हणजे चावून खाण्याजोगे पदार्थ असा चार प्रकारचा आहार असावा. कारण असा आहार शरीरपोषण व्यवस्थित करण्यास सक्षम असतो. या प्रकारचे चतुर्विधत्व आहारातून सहज शक्‍य असते. मांसाहार हा फक्‍त भक्ष्य प्रकारात आणि मांसापासून “मांसरस (सूप)’ तयार केला तर, फार तर पेय प्रकारात बसू शकतो.

    आयुर्वेदाने अन्नयोग संकल्पनेमध्ये षड्रस म्हणजे मधुर, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट अशा सहा चवींचा समावेश केला आहे.

    सर्व रसाभ्यासो बलकराणां श्रेष्ठः ।एक रसाभ्यासो दौर्बल्यकराणाम्‌ ।।…चरक सूत्रस्थान

    सहाही रसांचे (चवींचे) सेवन बल वाढवण्यासाठी व स्वास्थ्य टिकवण्यासाठी अत्यावश्‍यक आहे. केवळ एक-दोन रसांचे सेवन केल्यास मनुष्याला दुर्बलता येते व त्यातून विविध रोगही उद्भवू शकतात.

    शाकाहारातून षड्रस
    धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे यांचे गुणधर्म पाहिले असता लक्षात येते, की त्यांच्या योग्य संयोगातून आपणास सहाही रस मिळू शकतात. ऋतूंनुसार मिळणाऱ्या भाज्या व फळांतूनही त्या त्या ऋतूतील दोषस्थितीचे संतुलन करता येऊ शकते. याउलट मांसाहाराचा विचार केल्यास समजते, की बहुतांशी सर्व प्रकारचे मांस मधुर रसाचे आहे. क्वचित एखादेच मांस मधुर रसासह तुरट रसाचे किंवा तिखट विपाकाचे आहेत. अर्थात त्यामुळे मांसाहार हा पूर्ण आहार होऊ शकत नाही. आयुर्वेदात मांसाचे जे गुणधर्म सांगितले आहेत, त्यानुसार बहुतेक सर्व मांस पचण्यास अतिशय अवघड, उष्णता वाढविणारे व कफ, पित्तदोष वाढविणारे असतात असे समजते म्हणूनच जे नित्य व्यायाम करतात व ज्यांचा अग्नी प्रदीप्त आहे अशा व्यक्‍ती जर असा मांसाहार पचवू शकल्या तरच त्यापासून त्यांचे बल वाढू शकते, शुक्रधातूला शक्‍ती मिळू शकते.

    मांसाहार पचन क्षमतेत घट
    सध्याची जीवनशैली पाहता, हवामानातील बदल पाहता मांसाहार अनुकूल ठरण्याची शक्‍यता फारच कमी झालेली दिसते. मांसाहार पचण्यासाठी शारीरिक मेहनत आवश्‍यक असते, सध्या शरीराच्या तुलनेत मानसिक, बौद्धिक श्रमांचेच प्रमाण इतके वाढले आहे की मांसाहार पचवण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होते आहे.

    निसर्गातही काही पक्षी व प्राणी शाकाहारी तर काही मांसाहारी असतात असे आढळते. मात्र या प्राण्यांच्या शरीरशास्त्राचा, शरीरक्रियांचा अभ्यास केला तर शाकाहारी प्राण्यांपेक्षा मांसाहारी प्राण्यांची मूलभूत जडणघडण विशेष पद्धतीने झाली आहे असे समजते. मांसाहारी प्राण्यांमधली आक्रमकता वेगळी असते, त्यांची मानसिकता, जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते. त्यांचे दात व पचनसंस्था वेगळ्या तऱ्हेने विकसित झालेली असते. मानवी शरीराची जडणघडण या पद्धतीची नाही. प्राण्यांपेक्षा वेगळी जीवनपद्धती, वेगळी मानसिकता असणे अपेक्षित असणाऱ्या मनुष्यप्राण्यासाठी मांसाहार हा आदर्श नाही. औषधातही फार क्वचित ठिकाणी मांसाचा अंतर्भाव केलेला आढळतो. खूपच धातुक्षय झाला असेल, तातडीने शक्‍ती देण्याची आवश्‍यकता असेल, तेव्हासुद्धा मांसाहारापेक्षा मांसरस (सूप) घ्यायला सांगितलेला दिसतो. मांससूप तृप्ती करणारे आहे. ज्याचे शरीर सुकत चालले आहे, जो रोगापासून मुक्‍त झाला आहे, जो स्वभावतःच कृश आहे व ज्यांचे शुक्र क्षीण झाले आहे त्यांनी मांससूप सेवन करावे असे चरकाचार्य म्हणतात. पण त्याच्याच पुढे ते असेही म्हणतात, व्यायामनित्याः । अर्थात जे नित्य व्यायाम करतात, म्हणजेच ज्यांचा जाठराग्नी प्रदीप्त असल्याने पचायला जड असणाऱ्या मांसाला पचवण्यास समर्थ आहे त्यांनीच मांससूप सेवन करावे. मद्य व मांस दोन्हीही राजस, तामस व मनोदोष वाढवणारे आहेत.

    शाकाहार सुरक्षित
    आहार सेवनाचा मुख्य उद्देश असतो, शरीराचे धारण करणे, शरीरावश्‍यक सर्व तत्त्वांची पूर्ती होणे. हा उद्देश पूर्ण होण्याबरोबरच दुसऱ्या बाजूने त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना याकडे लक्ष देणेही आवश्‍यक असते. जसे गाडीमध्ये इंधन टाकताना आपण ते जितक्‍या चांगल्या प्रतीचे, जितके शुद्ध स्वरूपातील निवडू तितकी गाडी अधिक चांगली पळते, अधिक टिकते. शाकाहार व मांसाहार दोन्हीही पोट भरण्यास सक्षम असले तरी मांसाहाराच्या तुलनेत शाकाहार शरीराबरोबरच मानसिक पातळीवरसुद्धा अधिक सुरक्षित असतो, नुकसान न करणारा असतो.

    सध्या तर प्राण्यांचे वजन वाढावे, अंडी मिळण्याचे प्रमाणे वाढावे, कमीत कमी वेळात अधिक अंडी मिळावीत म्हणून अनेक अनैसर्गिक औषधांचा, हॉर्मोन्सचा सर्रास वापर केला जातो. ही सर्व शरीरघातक, अनैसर्गिक तत्त्वे मांसाहारात तशीच राहतात, मांसाहार सेवन करण्याच्या पोटात जातात, त्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

    बऱ्याचदा शाकाहारातून जीवनावश्‍यक सर्व तत्त्वांची पूर्ती होत नाही म्हणून मांसाहार आवश्‍यक आहे असा प्रचार केला जातो, पण संतुलित शाकाहार म्हणजे दूध, तूप, भाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये वगैरे सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहार असला तर त्यातून सर्व आवश्‍यक तत्त्वे मिळू शकतात व ती सहज पचतात.

    एक गोष्ट लक्षात घ्यावी की खाणे जरी आपल्या हातात असले तरी पचवणे आपल्या हातात नाही. शेवटी जिभेला चांगले लागणारे असो, खाण्यापूर्वी ते अन्न कसेही असो, पचनानंतर त्याचे काय होते त्यालाच महत्त्व असते. म्हणजे त्यापासून कशा प्रकारचे शरीर, बल, प्राणशक्‍ती व मनोधारणा तयार होते हेच महत्त्वाचे ठरते.

    तेव्हा आपल्या शरीराला जे मानवेल, म्हणजेच नैसर्गिक रीत्या पचून बल देईल, असे अन्न प्रत्येकाने खावे. पूर्वी आपण पाहिले आहेच की केवळ शाकाहारच षड्ररसपूर्ण व चार प्रकारचे अन्न पुरवू शकतो. तेव्हा शाकाहाराचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने शाकाहार करावा.

  • काळजी हृदयाची

    काळजी हृदयाची

    आयुर्वेदात “स्रोतस’ नावाची एक विशेष संकल्पना आहे. शरीरात महत्त्वाची अशी तेरा स्रोतसे असतात. प्रत्येक स्रोतसाची काही विशिष्ट कामे असतात. उदा. अन्नवहस्रोतसाचे काम अन्न स्वीकारणे, ते पचवणे, नंतर उरलेला मलभाग शरीरातून टाकून देणे असते. प्राणवहस्रोतसाचे काम श्‍वासामार्फत आलेला प्राण स्वीकारून उच्छ्वास बाहेर टाकण्याचे असते. स्रोतसाचे असे विशिष्ट अवयव असतातच, पण प्रत्येक स्रोतसाची दोन मुळे असतात. ही मुळे प्रत्यक्ष स्रोतसापासून शरीरात शारीरिकदृष्ट्या दूरही असू शकतात. पण स्रोतसाच्या कार्यकारित्वाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. हदय हे रसवहस्रोतसाचे व प्राणवहस्रोतसाचे मूळ असते. म्हणूनच या दोन स्रोतसांमधला बिघाड हृदयाला बाधक ठरू शकतो आणि हृदयातील दोषामुळे या दोन स्रोतसांचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही.

    प्राणवहस्रोतसाचे एक मूळ हृदय असते, तर दुसरे मूळ असते महास्रोत म्हणजे मुखापासून ते गुदापर्यंतचा भाग. स्रोतसाचे एक मूळ बिघडले तर त्याचा परिणाम दुसऱ्या मुळावर होणेही स्वाभाविक असते. थोडक्‍यात, रसवहस्रोतस, प्राणवहस्रोतस किंवा महास्रोतसात बिघाड झाला तर त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात.

    स्रोतस व हृदय
    अतिमात्रस्य चाकाले चाहितस्य च भोजनम्‌ । अन्नवाहिनी दुष्यन्ति वैगुण्यात्‌ पावकस्य च ।। …चरक विमानस्थान
    अवेळी अति प्रमाणात भोजन करण्याने, प्रकृतीला अहितकर भोजन करण्याने व अग्नीतील बिघाडामुळे पचनसंस्थेत बिघाड होतो व त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात.

    रसवहस्रोतस व हृदय
    गुरुशीतमतिस्निग्धं अतिमात्रं समश्‍नताम्‌। रसवाहिनी दुष्यन्ति चिन्त्यानां चाति चिन्तनात्‌ ।। …चरक विमानस्थान
    पचण्यास जड, अति थंड, अति स्निग्ध पदार्थ खाण्याने, अति मात्रेत भोजन करण्याने व अति चिंता करण्याने रसवहस्रोतस बिघडते. रसवहस्रोतसाचे मूळ हृदय व हृदयातून निघणाऱ्या धमन्या असल्याने रसवहस्रोतस बिघडले की त्याचा परिणाम सरळ हृदयावर होताना दिसतो.

    कारणानुरूप ज्या कोणत्या दोषात बिघाड होतो तो दोष रसधातूला बिघडवतो. बिघडलेला रसधातू हृदयात पोचला की त्या ठिकाणी बाधा उत्पन्न करतो आणि हृद्रोग होतो. यावरून एक गोष्ट लक्षात येते, की कारणानुरूप जो दोष बिघडेल त्यानुसार हृद्रोगाची लक्षणे बदलतात. नेमका कोणता दोष कारणीभूत आहे हे पाहून उपचारांची दिशा ठरवावी लागते. हृद्रोगातील लक्षणांचा निश्‍चित अभ्यास करून व नाडीपरीक्षा करून हृद्रोगाबाबतचा निर्णय वैद्याने घ्यायचा असतो. एखाद्या लक्षणावरून हृदयविकार झाला असे समजून घाबरू नये.

    वातामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे * हृद्‌शून्यभाव – हृदयात पोकळी असल्यासारखे वाटणे.
    * हृद्‌द्रव – छातीत धडधडणे. व्यायाम वा काही उत्सुकता असली की सुद्धा छातीत धडधडते पण त्या धडधडण्यापेक्षा हे धडधडणे वेगळे असते. मुख्य म्हणजे हृद्रोगात काहीही कारण नसताना अचानक धडधड सुरू होते.
    * हृत्शोष – छातीत, हृदयात शोष पडण्यासारखे वाटणे, कोरडेपणा वाटणे.
    * हृन्भेद – हृदयाच्या ठिकाणी फुटल्याप्रमाणे तीव्र वेदना होणे.
    * हृत्स्तंभ – हृदयाचे कार्य एकाएकी थांबले आहे असे वाटणे.
    * हृदयोद्वेष्टन – छातीत पिळवटल्याप्रमाणे वेदना होणे.
    * हृत्तोद – छातीत टोचल्याप्रमाणे दुखत राहणे.
    * दीनता-भय-शोकप्रतीती – एकाएकी, विशेष असे कारण नसतानाही दीन, खिन्न होणे, भीती वाटणे, शोकग्रस्त होणे.
    * शब्दासहिष्णुता – मोठा आवाज, गोंगाट, गडबड सहन न होणे.
    * वेपथुः – सर्वांगाला कापरे भरणे.
    * श्‍वासरोध – श्‍वास घेण्यास व सोडण्यास त्रास होणे.
    * अल्पनिद्रता – झोप कमी येणे.
    वातकाळात म्हणजे जेवण पचल्यावर, अगदी पहाटे वा सूर्यास्तानंतर छातीत वेदना होणे.

    पित्तामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे
    * हृद्‌दाह – छातीत जळजळणे.
    * तिक्‍तास्यता – तोंडात कायम कडवट चव जाणवणे.
    * अम्लोद्‌गार – आंबट ढेकर येणे.
    * क्‍लम – अकारण थकवा वाटणे.
    * शोष – पाणी प्यायले तरी तहान न शमणे.
    * मूर्च्छा – घेरी / चक्कर येऊन खाली पडणे.
    * भ्रम – गरगरणे.
    * स्वेद – अकारण, एकाएकी घाम फुटणे.
    * अम्लच्छर्दि – आंबट चवीची उलटी होणे.
    * धूमक – हृदयातून धूर येत असल्यासारखे वाटणे.
    * तमःप्रवेश- डोळ्यासमोर अंधारी येणे.
    * ज्वर – शरीरतापमान वाढणे.
    जेवणानंतर थोड्या वेळाने, भूक लागली असता वा मध्यरात्री त्रास होणे.

    कफदोष वाढल्यामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे
    * हृद्‌भार – छातीत जडपणा जाणवणे.
    * हृत्स्तंभ – हृदयात जखडल्यासारखे वाटणे.
    * तंद्रा – आळस, तंद्रीत असल्यासारखे वाटणे.
    * अरुची – तोंडाला चव नसणे.
    * अग्निसाद – भूक न लागणे, अग्नीचे काम मंदावणे.
    * अतिनिद्रा – अति प्रमाणात झोप येणे.
    * आस्यमाधुर्य – तोंडात गोडसर चव राहणे.
    जेवणानंतर लगेच वा सकाळच्या वेळेस अस्वस्थ वाटणे.

  • पावसाळा

    पावसाळा

    चातुर्मासातील व्रतांच्या मागे असलेले विज्ञान किती अचूक आहे हे आपल्याला सहज कळते; पण याकडे स्थूलपणे पाहिले, तरी इतर कुठली स्वर्गीय मदत मिळो – न मिळो, पण आरोग्य चांगले राहण्यासाठी ह्या सर्व व्रतवैकल्यांचा उपयोग होतो हे लक्षात येईल.

    चातुर्मास म्हणजे चार महिने. वर्षाचे ऋतू सहा आहेत असे आपण मानतो. चैत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद वर्षा ऋतू, आश्‍विन-कार्तिक शरद ऋतू, मार्गशीर्ष -पौष हेमंत ऋतू, आणि माघ-फाल्गुन शिशिर ऋतू असे सर्वसाधारण ऋतुचक्र असते.

    श्रावण-भाद्रपद वर्षा ऋतू असे म्हटले गेले असले, तरी अलीकडचे काही दिवस व पलीकडचे काही दिवस मिळून पावसाळा साधारण चार महिने असतो. हा चार महिन्यांचा कालखंड चातुर्मास म्हणून ओळखला जातो. बहुतेक ठिकाणी चार ऋतू महत्त्वाचे समजले जातात. तीन तीन महिन्यांचे चार ऋतू अशा तऱ्हेनेही वर्षाची विभागणी केलेली दिसते.

    वातावरण जसे बदलते तसे सर्वच प्राणिमात्रांमध्ये, सृष्टीमध्ये फरक पडतो. त्या दृष्टीने जीवनाच्या गणिताचे मोजमाप करावे लागते. पावसाचे महिने आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसतात. म्हणून पावसाळा आला रे आला की आषाढी एकादशीपासूनच काळजी घ्यायला सुरू करणे आवश्‍यक असते. ही काळजी घेण्याच्या दृष्टीने या दिवसापासून सुरू झालेला चातुर्मास दीपावलीपर्यंत चालतो. चातुर्मासाचा एकूणच पाप-पुण्याशी, संस्कृतीशी, देवाधर्माशी संबंध जोडणे मनुष्याला अधिक सोयीचे वाटते. कारण आचरणात आणण्यासाठी सोपे जाते म्हणून चातुर्मासाची व्रतवैकल्ये भारतीय संस्कृतीने बेतून दिलेली आहेत.
    या सर्व व्रतवैकल्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे खाण्या-पिण्यावरील निर्बंध. एकदा जेवणे, सूर्यास्तापूर्वी जेवणे, अमुक वस्तू अमुक दिवशी न खाणे, सोमवारी मुगाची खिचडी न करणे, विशिष्ट दिवशी विशिष्ट पक्वान्न करणे, कुठला तरी एक दिवस चूल न पेटवणे असे नियम केलेले दिसतात.

    श्रावणातील ऋषिपंचमीचे व्रत म्हणजे सेंद्रिय शेतीला, तसेच शेतीसाठी केलेल्या कष्टांना महत्त्व देण्याचाच एक प्रकार आहे असे म्हणायला हरकत नाही. नागाची पूजा करून सर्पांना अभयदान देण्यासाठी नागपंचमी; वडाची पूजा करून मनुष्याला पुनरुत्पत्तीसाठी व स्वतःचे शरीर नीट टिकवून सौंदर्य वाढविण्यासाठी तसेच उन्हातान्हात सावलीसाठी वटवृक्ष एखाद्या वृद्ध आजोबांसारखा मदत करतो ही माहिती सांगण्यासाठी वटपौर्णिमा; पावसाळ्यात बाहेरचे फिरणे कमी झाल्याने घरातल्या घरात स्वतःविषयीचा अभ्यास, अंतर्मुखता कशी साधावी यांचे ज्ञान मिळवून सद्गुरुंच्या पायी समर्पित होण्यासाठी तसेच गुरुतत्त्वाचा, ज्ञानाचा, मेंदूचा, मोठेपणाचा आदर करून त्यांना आपल्या जीवनात समाविष्ट करून घेऊन आपणही त्या लक्ष्यापर्यंत पोचू हे ध्येय डोळ्यासमोर राहण्यासाठी असलेली गुरुपौर्णिमा; शिवभक्‍ती करून जीवनात सौंदर्य व शांती मिळविण्यासाठी केलेले श्रावणात श्रावणी सोमवार;, अंगाला तेल लावून स्नान व अन्नदान करण्यासाठी श्रावणातले शनिवार; वनस्पतींची ओळख, त्यांचे घरगुती उपचार माहीत करून घेण्यासाठी (पत्री तोडताना संबंधित वनस्पतीच्या रसाचे सूक्ष्म भावाने आरोग्यप्राप्ती करून घेता येते) साजरे केलेले मंगळागौरी, हरतालिका हे सण; लग्नापूर्वीच्या मैत्रिणींना पुन्हा एकदा एकत्र करून रात्री जागरणे व खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाळा देऊन प्रेम वाढविण्यासाठी रात्रभर जागवलेल्या मंगळागौरी; लोकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कार्यक्रम आयोजित करून साजरा केलेला गणेशचतुर्थीचा उत्सव; शक्‍ति उपासना, कुंडलिनी जागरण व स्त्री-पुरुषांना एकत्र कार्य करता यावे या हेतूने असलेली नवरात्रातील दुर्गोपासना अशी अनेक व्रतवैकल्ये चातुर्मासात येतात.

    सूक्ष्मपणे विचार केला, तर या व्रतांच्या मागे असलेले विज्ञान किती अचूक आहे हे आपल्याला कळतेच; पण याकडे स्थूलपणे पाहिले तरी इतर कुठली स्वर्गीय मदत मिळो – न मिळो, पण आरोग्य चांगले राहण्यासाठी ह्या सर्व व्रतवैकल्यांचा उपयोग होतो हे सहज लक्षात येते.

    पावसाळ्यात जाठराग्नी मंद झालेला असतो, सूर्याचे दर्शन रोज होईलच याची शाश्‍वती नसते अशा वेळी पोटाचे स्वास्थ्य सांभाळण्यासाठी श्रावणाचा एक महिना मांसाहार वा जडान्न न खाण्याचे व्रत पाळणारे भाग्यवान ठरतात. एरवीही मांसाहार वा जडान्न पचले नाही तर मोठमोठ्या रोगांना आमंत्रण मिळते, तर मग पावसाळ्यात व भर श्रावणात मांसाहार केला तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील हे सांगण्यासाठी धन्वंतरीची आवश्‍यकता नाही. भारतीय संस्कृतीवर बाहेरून कितीही आघात झाले तरी आजही चातुर्मासातील व्रतवैकल्ये आदराने, प्रेमाने व श्रद्धेने सर्व लोक करत असतात. या व्रतवैकल्यांमुळे शरीर-मनावर होणारे फायदे ताबडतोब दिसून येतात. विद्यापीठाच्या पातळीवर हे सर्व कुणी सिद्ध केले असेल वा नसेल, पण वैयक्‍तिक पातळीवर ह्या व्रतवैकल्यांचा सर्वांनी अनुभव घेतलेला असतो व त्यातून मिळालेले फायदे पदरात पाडून घेतलेले असतात.

    हे सर्व थोतांड आहे, ह्याने काय होणार असे आक्षेप बऱ्याच वेळा आधुनिकतेच्या नावाखाली घेतले जातात व हे सर्व सिद्ध झालेले आहे का, कोण ह्या देवता, देवदेवतांच्या पूजा का करायची अशा शंका काढल्या जातात. पण हेच लोक गणपती उत्सव व नवरात्र हे दोन उत्सव मात्र हिरिरीने भाग घेऊन करतात. असा आक्षेप घेणारे काही जण असले तरी सर्वसामान्यजन चातुर्मासातील व्रतवैकल्ये अवश्‍य करतात. त्यातील काही व्यक्‍तिगत कारणाने, अहंकारापायी वा एखाद्या वस्तूची उपलब्धता असल्या-नसल्यामुळे फाफटपसारा वाढू शकतो. असे होणे चांगले नाही.

    तसे पाहिले तर केवळ चातुर्मासातील व्रतवैकल्येच वैज्ञानिक पायावरती, शरीर-मन व आत्म्याचे आरोग्य मिळावे व उत्कर्ष व्हावा या हेतूने तयार केलेली आहेत असे नव्हे, तर वर्षात येणारे सर्व सण व व्रतवैकल्ये कुठल्या ना कुठल्या फायद्यासाठी व विशिष्ट कारणानेच आयोजित केलेली दिसतात. अगदी दीपावलीच्या वेळी केली जाणारी फटाक्‍यांची आतषबाजी सुद्धा आवश्‍यक असते. तुझ्या फटाक्‍याचा आवाज मोठा का माझ्या फटाक्‍यांचा, अशा स्पर्धेपायी कानठळ्या बसविणारे उखळी बॉम्बसारखे फटाके फोडणे उचित नाही. अधिक वेळ चालण्यासाठी २०-२५ हजार फटाक्‍यांची माळ बनविणे वगैरे अतिरेक सोडून देऊन संतुलित पद्धतीने सण साजरे केले, तर त्यामागचे विज्ञान कळून येऊ शकते व त्याचे फायदे दिसतात.

    भाद्रपदात येणाऱ्या गणपतीचे व्रत हे केवळ सामाजिक संमेलनापुरतेच मर्यादित नसते, तर त्यात योगशास्त्राप्रमाणे असलेल्या शरीररचनेतील शक्‍तिउत्थापनाचे काम करता येईल अशी योजना केलेली असते.

    दीपावलीचे फराळाचे पदार्थ येणाऱ्या ऋतुमानात बदललेल्या पचनसंस्थेसाठी सुचविलेले असतात. एकूणच सर्व व्रतवैकल्यांची सांगड आरोग्याशी घातली गेली असल्यामुळे त्यांची यथासांग माहिती करून घेऊन त्यातल्या विज्ञानावर व स्वतःच्या लाभावर लक्ष ठेवून जर साजरी केली गेली तर देवाची कृपा, आरोग्यप्राप्ती व आनंदप्राप्ती होईल हे निश्‍चित !!

  • ’उन्हाळ्याच्या झळा’

    ’उन्हाळ्याच्या झळा’

    प्रत्येक प्राण्याच्या शरीराचे एक विशिष्ट तपमान असते. माणसाच्या शरीराचे तपमान सामान्यतः 98.6 फॅरनहीट असते. पण त्यात बदल होऊ लागला की अस्वस्थता जाणवते. शरीरात जवळ जवळ दोन तृतीयांश पाणीच असते व ह्यामुळे माणसाला ऊब जास्त आवडते. ऊब म्हणजे बाहेरील उष्णतेचा व मायेचा संबंध ! शरीर आतून किंवा बाहेरून उष्णतेने तापू लागले की शरीरातील पाणी कमी होऊ लागते व जीव अस्वस्थ होतो.
    शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडले की एूकणच जीवनाचेच संतुलन बिघडते. उन्हामुळे त्वचा काळी पडणे, डोळ्यांची आग होणे, लघवी कमी होणे, शौचाला-लघवीला जळजळ होणे, चक्कर येणे, याबरोबरच शरीरात रुक्षता जाणवते. पावसाळ्यातही रोगांची जास्ती काळजी घ्यावी लागते पण उन्हाळ्यात जरा जरी निष्काळजी राहिले तरी छोटे मोठे त्रास होण्याचा संभव अधिक असतो.

    उन्हाळ्यात वातावरणात खालील लक्षणे दिसू लागतात.

    * सूर्याची किरणे प्रखर होतात.
    * हवामान गरम होते.
    * नैर्ऋत्य दिशेने गरम वारे वाहू लागतात.
    * नद्या व इतर प्रवाहांचे पाणी कमी होते.
    * झाडांची पाने गळतात. गवत, झुडपे, वेली सुकून जातात.
    * जमिनीला भेगा पडतात.

    शरीरातील त्रिदोषांची स्थिति –
    आधीच्या म्हणजे वसंत ऋतूत वाढलेला कफदोष आपोआप कमी होतो. परंतु हवेतील उष्णता वाढल्याने वातावरण रुक्ष होते व शरीरात वातदोष साठावयास सुरवात होते.

    शरीराची पचनशक्ति –
    गरम हवेमुळे जाठराग्नीची पचनशक्ति कमी होते व म्हणूनच भूक फारशी लागत नाही.

    ऋतुचर्येचे मुख्य तत्त्व –
    स्वादु शीतं द्रवं स्निग्धमन्नपानं तदा हितम्‌ ।
    लवणाम्लकटूष्णानि व्यायामं चात्र वर्जयेत्‌ ॥…..चरक सूत्र
    मधुर म्हणजे चवीला गोड, थंड, द्रव व स्निग्ध अन्नपान या ऋतूत हितकर आहे तर खारट, आंबट, कडू, व उष्ण अन्नपदार्थ वर्ज्य करावेत. व्यायामही अति प्रमाणात करू नये.

    उन्हाळ्यात कसे वागावे?
    * अगदीच महत्त्वाचे व आवश्यिक काम असल्यासच उन्हात घराबाहेर पडावे.
    * पातळ व सुती कपडे घालावेत व तेही शक्यतो पांढऱ्या, किंवा फिक्या रंगांचे असावेत.
    * बाहेर जाताना छत्री, टोपी व गॉगल्सच्या चष्म्यांचा वापर करावा.
    * घरात पंखा, ए.सी. किंवा खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावून, पाणी छाटून थंडावा निर्माण करावा.
    * घामाघूम होईल असा व्यायाम न करता पोहण्याचा व्यायाम करावा.
    * शक्यतो गार पाण्याने स्नान करावे व अंगाला चंदन, वाळा, अशा शीत द्रव्यांचे चूर्ण लावावे.
    * इतर ऋतूत दुपारची झोप अत्यंत निषिद्ध सांगितलेली असली तरी उन्हाळ्यात अर्धा-पाऊण तास झोप आवश्य्क आहे. रात्र लहान असल्यामुळे झोप तशीही कमी झालेली असते.
    * सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालावे. व सायंकाळी हिरवीगार झाडी असलेल्या बगीच्यात फिरायला अवश्यह जावे.
    * रात्री चांदण्यात झोपावे.
    * बाहेर उन्हात जाताना लिंबाचे सरबत पिऊन निघावे.
    * उष्माघात झाल्यास कांद्याचा रस पाजावा.
    * उन्हाळ्यात गुळवेल सत्त्व, प्रवाळ, मोती भस्म, गुलकंद, मोरावळा ह्या औषधींचा खास उपयोग होतो.
    * धान्यात तांदूळ, नाचणी, ज्वारी यांचा उपयोग करावा. बाजरी गुणधर्माने उष्ण असल्याने बाजरीचे पीठ वापरायचे झाल्यास त्यात ज्वारीचे पीठ समप्रमाणात मिसळावे व भाकरी करावी.
    * दूर्वांचा रस पोटात घेण्यास उत्तम आहे.
    * ग्रीष्म ऋतूत मूत्रल दोष उत्पन्न होतात. लघवी अडकणे, किंवा लघवीला आग होणे अशा तक्रारी जाणवतात. अशा वेळी धण्याची पूड काही वेळ पाण्यात भिजवून, खडीसाखर घालून प्यावे.
    * औदुंबराचे पाणी किंवा औदुंबराच्या फळाचे सरबत हे उन्हाळी लागल्यास उत्तम औषध आहे.
    * उन्हात खेळ खेळावे लागल्यास त्वचेवर संरक्षक मलम लावून खेळावे.
    * शरीरातील उष्णतेमुळे नाकातून रक्त येण्याची सवय असणाऱ्यांना उन्हाळ्यात हा त्रास अधिकच होतो. शरीरातील कडकी दूर करून थंडावा देणारी गुलकंद, प्रवाळ यासारखी औषधे घेतल्यास , कांदा सुंघवल्यास किंवा उगाळलेल्या चंदनाचा लेप कपाळावर लावल्याने हा त्रास कमी होतो.
    * व्यायामानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर बऱ्याच जणांना खूप घाम येतो. अशा वेळी घामाने भिजलेले कपडे अवश्यल बदलावेत. काखेत घामाचा बॅक्टेरियांशी संबंध आल्याने शरीराला दुर्गंध येऊ लागतो. त्यासाठी कोलन वॉटर ने काखा साफ करून तेथे चंदन, मंजिष्ठा, किंवा टाल्कम पावडर छिडवावी.
    * तळपाय व तळहाताची जळजळ होत असल्यास मेंदी वाटून किंवा भिजवून लेप केल्याने किंवा तूप लावून काशाच्या वाटीने तळपाय व तळहात घासल्याने दाह कमी होतो.
    * आहारात घरचे साजूक तूप, ताजे लोणी यांचा समावेश असणे. जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण, सॅनकूल चूर्ण तसेच कपभर कोमट पाण्यासह दोन चमचे साजूक तूप घेणे.
    * सर्व तऱ्हेच्या फळांच्या सरबतांचा आनंद घेण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतु आहे.
    * पालक, तांदुळजा, माठ, राजगिरा, एवढेच नव्हे तर सर्व पालेभाज्यांचा भरपूर वापर करावा.
    * कैरीचे पन्हे उन्हाळ्याच्या दिवसात उत्तम. कैरी उकडून आतील गर पाण्यात कुस्करून गाळून त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ, जिरे घालून पन्हे करावे.
    * साधे लिंबू सरबत सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर ठरते. येण्याऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा ऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, गुलाब सरबत वगैरे द्यावे.
    * शहाळ्याचे पाणी व नारळाचे दूध थंडावा देऊन शरीराची ताकद वाढवते.
    * काकडी उन्हाळ्यासाठी निसर्गाचे दुसरे वरदान! काकडी कापून मीठ, लावून खावी. तसेच काकडीची कोशिंबीर उन्हाळ्यात अवश्यण खावी. कमी होणाऱ्या लघवीसाठी पण काकडी उपयोगी पडते.
    * कोहळ्याचा पेठा उन्हाळ्यात कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी उत्तम ! आंबा हे फळ उन्हाळ्यात येत असले तरी उष्ण असल्यामुळे आमरस नेहमीच तूप घालूनच घ्यावा.

    उन्हाळ्याच्या त्रासाला हरवणारा आहार
    * तिखट, रुक्ष व खूप गरम गोष्टी खाऊ नयेत.
    * दही, लस्सी वर्ज्य समजावी.
    * ढोबळी मिरची, कारले, मेथी या भाज्या सहसा वापरू नयेत
    * पचावयास जड आणि शरीरात वात वाढवणारे मटार, पावटा, चवळी, हरबरा, छोले, वाल अशी कडधान्ये टाळावीत.
    * हिंग, मोहरी, ओवा, तीळ, लाल मिरची, अशी तीक्ष्ण मसाल्याचे पदार्थ वापरू नयेत. चिंच अननस, कच्चा टोमॅटो ही आंबट फळे खाऊ नयेत.
    * डाळींचा उपयोग कमी करावा.
    * कांदा ग्रीष्म ऋतूसाठी लाभदायक आहे. लसणाची चटणी मात्र खाऊ नये.
    * सर्व तऱ्हेच्या फळांच्या सरबतांचा आनंद घेण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतु आहे.
    * पालक, तांदुळजा, माठ, राजगिरा, एवढेच नव्हे तर सर्व पालेभाज्यांचा भरपूर वापर करावा.
    * कैरीचे पन्हे उन्हाळ्याच्या दिवसात उत्तम. कैरी उकडून आतील गर पाण्यात कुस्करून गाळून त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ, जिरे घालून पन्हे करावे.
    * साधे लिंबू सरबत सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर ठरते. येण्याऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा ऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, गुलाब सरबत वगैरे द्यावे.
    * शहाळ्याचे पाणी व नारळाचे दूध थंडावा देऊन शरीराची ताकद वाढवते.
    * काकडी उन्हाळ्यासाठी निसर्गाचे दुसरे वरदान! काकडी कापून मीठ, लावून खावी. तसेच काकडीची कोशिंबीर उन्हाळ्यात अवश्यन खावी. कमी होणाऱ्या लघवीसाठी पण काकडी उपयोगी पडते.
    * कोहळ्याचा पेठा उन्हाळ्यात कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी उत्तम! आंबा हे फळ उन्हाळ्यात येत असले तरी उष्ण असल्यामुळे आमरस नेहमीच तूप घालूनच घ्यावा.

    उन्हाळ्यात त्वचेवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून उन्हात जाताना सनस्क्रीन क्रीम लावणे सर्वपरिचित असते. मात्र त्याबरोबरीने पुढील उपाय योजता येतात.
    स्नानाच्या वेळी साबणाऐवजी अनंतमूळ, चंदन वगैरे शीतल द्रव्यांपासून बनविलेले उटणे वापरण्याने, मसुराचे पीठ व सॅन मसाज पावडर यांचे समभाग मिश्रण वापरण्यानेही उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण होत असते. उन्हाळ्यात कपडे सुती किंवा रेशमी, शक्यतो हलक्या रंगाचे घालणे, फार घट्ट कपडे घालणे टाळणे श्रेयस्कर असते. घामोळे आल्यास त्यावर चंदनाचे गंध लावण्याचा उपयोग होतो. वाळा, धणे व नागरमोथा यांच्या चूर्णाचा थंड पाण्यात लेप करण्याने किंवा जांभळाची बी उगाळून लावण्यानेही घामोळ्या कमी होतात. शरीरातील उष्णता कमी व्हावी, बरोबरीने रक्तशुद्धी व्हावी याताठी अनंत कल्प, शतावरी कल्प, संतुलन पित्तशांती गोळ्या घेणेही उत्तम असते.
    सूर्य हाच जगाचा तारक आहे. शारीरिक आरोग्यासाठी सूर्य, मानसिक आरोग्यासाठी मोकळेपणा व पारदर्शकता देणारा सूर्य आणि अध्यात्मिक आरोग्यासाठी ज्ञानप्रकाश देणाराही सूर्यच !! उन्हाळ्यात होणाऱ्या थोड्याश्याळ गैरसोयी सोप्या उपायांनी कमी करून सूर्योपासना हाच मानवतेचा तारकमंत्र !!!

    घराच्या बाहेर जाताना छत्री, टोपी व गॉगल्सच्या चष्म्यांचा वापर करावा.

    उन्हात खेळ खेळावे लागल्यास त्वचेवर संरक्षक मलम लावून खेळावे.

    आहारात घरचे साजूक तूप ताजे लोणी यांचा समावेश असणे.

    सर्व तऱ्हेच्या फळांच्या सरबतांचा आहारात वापर करावा.

    पालक, तांदुळजा, माठ, राजगिरा, एवढेच नव्हे तर सर्व पालेभाज्यांचा भरपूर वापर करावा