अभ्यंग – बाळाला रोज तेलाचा अभ्यंग करावा. यासाठी औषधांनी सिद्ध केलेले ‘संतुलन बेबी मसाज तेल’ उत्तम ठरते. सकाळी अंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला हलक्या हाताने तेल लावावे. तेल लावताना फार जोर लावू नये, रगडण्यामुळे किंवा फार जोर दिल्याने बाळाला त्रास होऊ शकतो. बाळाला खेळवत हळुवार हातांनी व मायेेने तेल लावल्यास बाळालाही तेल लावून घेणे आवडते. बाळाला पायावर घेऊन तेल लावणे सगळ्यात सोपे असते, मात्र तसे न जमल्यास त्याला मऊ दुपट्यावर ठेवून तेल लावले तरी चालते.
सर्वप्रथम, व्यवस्थित जिरेल अशा पद्धतीने टाळूवर तेल थापावे. नाभीमध्ये दोन-तीन थेंब तेल सोडावे, तसेच कानामध्ये प्रत्येकी दोन-तीन थेंब टाकावेत. तेल लावण्याची सुरुवात पायापासून करावी आणि तेल लावताना पायाच्या तळव्यापासून वर मांडीपर्यंत, हाताच्या तळव्यापासून वर दंडापर्यंत याप्रमाणे दिशा ठेवावी. पाठीसही खालून वर व पोटावर घड्याळाच्या दिशेने गोलाकार हात फिरवीत तेल लावावे. तेल कोमट असलेले चांगले. किमान पावसाळ्यात व हिवाळ्यात तरी तेल कोमट करूनच वापरावे. तेल लावल्यावर बाळाला साधारणपणे अर्ध्या तासानंतर अंघोळ घालावी. याप्रकारे नियमित अभ्यंग केल्यास बाळाची हाडे व स्नायू बळकट व्हायला मदत होते; त्वचा कोमल आणि सतेज होते; शरीराची वाढ व्यवस्थित होते; एकंदर प्रतकारशक्ती वाढते आणि झोप शांत यायलाही मदत मिळते. विशेषतः संध्याकाळी पुन्हा एकदा तेल लावल्याने शांत झोप यायला मदत मिळते.
खरे तर बाळाला पहिली दोन वर्षे नियमित अभ्यंग करणे चांगले; पण किमान पहिले आठ-नऊ महिने तरी रोज अभ्यंग करावा. नंतरही पाच वर्षांपर्यंत आठवड्यातून एक-दोन वेळा अभ्यंग करणे चांगले.
बाळाच्या अंघोळीचे पाणी फार गरम किंवा फार गार नसावे. बाळाची त्वचा नाजूक आणि अतिशय संवेदनशील असल्याने साबणाऐवजी उटणे लावणे अधिक चांगले. चंदन, अनंतमूळ, हळद, बेसन किंवा मसुराचे पीठ यांचे वस्त्रगाळ मिश्रण किंवा तयार ‘संतुलन बेबी मसाज पावडर’ साय किंवा दुधात मिसळून अंघोळीच्या वेळेला बाळाच्या अंगाला लावावी. अभ्यंग करताना, तसेच बाळाला अंघोळ घालताना बाळाच्या अंगावर वाऱ्याचा झोत येणार नाही याकडे लक्ष ठेवावे. अंघोळ झाल्यावर लगेच मऊ सुती वस्त्राने बाळाचे अंग हलक्या हाताने टिपून घ्यावे.
संतुलन बेबी मसाज पावडर – बाळाच्या कोमल व नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठी हे खास उटणे आहे. अनंतमूळ, गुलाबाच्या पाकळ्या, चंदन व जातकर्मसंस्कारात सांगितलेल्या अष्टगंधातील काही खास द्रव्यांपासून तयार केलेले हे उटणे स्नानाच्या वेळेला साय किंवा दुधात मिसळून बाळाच्या अंगाला लावावे (साबणाऐवजी). याच्या नियमित वृापराने त्वचा उजळते, पुरळ, रॅश, ॲलर्जी वगैरे त्रास होत नाहीत. तसेच साबणातील रासायनिक द्रव्यांमुळे होऊ शकणारा अपाय टाळता येतो.


Leave a Reply